हिंसाचार आणि आंदोलनाला लागलेल्या गालबोटानंतर प्रजासत्ताकदिनी दिल्लीत काढण्यात आलेली ट्रॅक्टर परेड मागे घेण्याचा निर्णय संयुक्त किमान मोर्चाने घेतला आहे. तसेच या परेडमध्ये सामिल झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आपल्या निश्चित आंदोलनस्थळी परतण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

संयुक्त किमान मोर्चाच्या संघटकांनी म्हटलं की, “आजची ट्रॅक्टर परेड मागे घेण्यात येत असून यात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या संबंधित आंदोलनस्थळी परतावे. तसेच यानंतरही हे आंदोलन शांततेत पार पडेल. याबाबत पुढील चर्चा होईल आणि लवकरच निर्णय घेतला जाईल.”

आणखी वाचा- ट्रॅक्टर मोर्चा : दिल्लीच्या रस्त्यांवर हिंसा करणारे घुसखोर होते; ४० शेतकरी संघटनांचा दावा

आणखी वाचा- दिल्ली ट्रॅक्टर परेड हिंसाचार : ८३ पोलीस कर्मचारी जखमी; चार गुन्हे दाखल

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सकाळी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. सुप्रीम कोर्टाने मध्यस्थी करण्यास नकार दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली होती. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राजपथावरील संचलन पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी देण्यात आली होती. दरम्यान, काही ठिकाणी या मोर्चादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष पहायला मिळाला.