सनातन संस्थेकडून धमकी दिली जात असल्याचा पत्रकार निखिल वागळे यांनी केलेला आरोप म्हणजे केवळ ‘स्टंट’ असून, सहानुभूती मिळवण्यासाठीच ते असे आरोप करताहेत, असे सनानत संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त वीरेंद्र मराठे यांनी ‘पीटीआय’ला सांगितले. सनातन संस्थेने कधीही निखिल वागळे यांना कोणतीही धमकी दिली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी रुद्र पाटील हा २००९ पासून संस्थेच्या कोणाच्याही संपर्कात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पानसरे हत्या प्रकरणात कोल्हापूर पोलीसांनी सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याला सांगलीमधून अटक केली आहे. वीरेंद्र मराठे म्हणाले, निखिल वागळे कायम आमच्या संस्थेविरोधात लिहित असतात. कोणी जर त्यांचे ट्विटर अकाऊंट बघितले, तर दिसून येईल की ते आम्हाला दहशतवादीच समजतात. आम्ही त्याकडे कायम दुर्लक्ष करीत आलो आहोत. आम्ही त्यांना कोणतीही धमकी दिलेली नाही.