तुलसीराम प्रजापति फेक एन्काऊंटर प्रकरणात अमित शाह हे मुख्य सूत्रधार होते असा दावा मुख्य तपास अधिकारी संदीप तामगडे यांनी केला आहे. याच बातमीचा आधार घेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी एक ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे. द वायरने दिलेली बातमी ट्विट करत राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की खुनाचा सूत्रधार भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष असणे हे भाजपाच्या परंपरेला साजेसेच आहे. तुम्ही सत्यापासून कधीही दूर जाऊ शकत नाही, सत्य कधीही लपत नाही समोर येतेच. असे म्हणत राहुल गांधी यांनी संदीप तामगडेंच्या बातमीचा आधार घेतला आहे. त्याच आधारे अमित शाह आणि भाजपावर टीका केली आहे.

काय आहे प्रकरण?
तुलसीराम प्रजापती यांच्या एन्काऊटर प्रकरणाची चौकशी करणारे तपास अधिकारी संदीप तामगडे यांनी असा दावा केला आहे की, यामागे मुख्य सूत्रधार अमित शाह, आयपीएस अधिकारी दिनेश एमएन, राजकुमार पांड्या आणि डीजी वंजारा यांचा हात आहे. संदीप तामगडे यांनी विशेष न्यायालयात यासंबंधीचा दावा केला आहे.

नेमका याच बातमीचा आधार घेत राहुल गांधी यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच भाजपवारही टीका केली आहे. भाजपावर टीका करण्याची एकही संधी राहुल गांधी सोडतना दिसत नाहीत. दोनच दिवसांपूर्वी अमित शाह यांनी राहुल गांधींवर टीका करत राहुल गांधींना मोदी फोबिया जडल्याचे म्हटले होते. मोदी हटवा हे राहुल गांधी यांच्यापुढचे लक्ष्य आहे. मात्र गरीबी आणि बेरोजगारी हटवा हे भाजपाचे लक्ष्य आहे असे म्हणत टीका केली होती. आज ट्विटच्या माध्यमातून भगवद्गीतेचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी अमित शाह आणि भाजपावर टीका केली. आता टीकेला भाजपाकडून कसे उत्तर दिले जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.