देशातील करोनाचा प्रसार अजूनही थांबलेला नाही. दिवसेंदिवस स्थिती गंभीर होत असून, दिवसाला एक लाखांच्या जवळपास रुग्ण आढळून येत आहेत. देशातील करोना परिस्थितीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी संसदेत सविस्तर निवेदन केलं. आरोग्य मंत्र्यांच्या निवेदनावर बोलताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी संसद सदस्यांनी सवाल करत मोदी सरकारवर टीका केली. “हा राजकीय लढा नाहीये, लोकांचा जीव वाचवण्यासाठी लढाई आहे,” अशी टीकाही राऊत यांनी केली.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी देशातील करोना परिस्थिती आणि सरकारनं केलेल्या उपाययोजनांविषयी संसदेत सविस्तर निवेदन केलं. आरोग्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर राज्यसभेत चर्चा झाली. यावेळी बोलताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं.

संसदेत बोलताना संजय राऊत म्हणाले,”माझी आई आणि भावालाही करोनाचा संसर्ग झाला होता. महाराष्ट्रात अनेक लोक करोनातून बरे होत आहेत. आज धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आहे. बृह्नमुंबई महापालिकेनं केलेल्या कामाचं जागतिक आरोग्य संघटनेनं कौतुक केलं आहे. काल काही सदस्यांनी महाराष्ट्रावर टीका केली, त्यामुळे मी हे सत्य सांगतोय,” असं संजय राऊत म्हणाले.

“मला सदस्यांना विचारायचं की असंख्य लोक करोनातून बरे कसे झाले? क्या लोग भाभीजी के पापड खा करके ठीक हो गये? ही राजकीय लढाई नाहीये, तर लोकांचे जीव वाचवण्याची लढाई आहे,” अशा शब्दात राऊत यांनी टीकाकारांना उत्तर दिलं.

“देशाची आर्थिक स्थिती खूप गंभीर झाली आहे. अशा स्थितीत देशाचा जीडीपी आणि रिझर्व्ह बँक कंगाल झाली आहे. त्यातच एअर इंडिया, रेल्वे, एलआयसी आणि बरंच काही सरकारनं बाजारात विक्रीसाठी काढलं आहे. बाजारात विक्रीसाठी मोठा सेल लागला आहे. आता या सेलमध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट देखील आणलं आहे,” अशी टीकाही राऊत यांनी सरकारच्या निर्गुंतवणूक धोरणावरून केली.