सध्या भारतात ज्या वेगाने करोनाचा फैलाव होतो आहे तो वेग तसाच राहिला तर १५ मे पर्यंत करोनाग्रस्तांची संख्या १३ लाखापर्यंत जाऊ शकते असा धक्कादायक अंदाज आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. कोव्ह-इंड-१९ या टीमने हा धक्कादायक अंदाज व्यक्त केला आहे. या टीममध्ये अमेरिका आणि भारतासह अनेक देशांच्या वैज्ञानिकांचा समावेश आहे. त्यांनी दिलेला एक अहवाल समोर आला आहे. या अहवालात त्यांनी ही धक्कादायक शक्यता व्यक्त केली आहे.

भारताने करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरुवातीला चांगली आणि कठोर पावलं उचलली. अमेरिका, इराण आणि इटली या देशांच्या तुलनेत भारताने उचलेली पावलं निश्चितच चांगली आहेत. मात्र भारतातील करोनाग्रस्तांची नेमकी संख्या किती हे अद्याप नीट समजू शकलेलं नाही. त्यामुळे ही स्थिती उद्भवू शकते असंही या टीमने म्हटलं आहे.

वैज्ञानिकांनी दिलेल्या अहवालानुसार, भारतात करोनाचा फैलाव वेगाने होतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित केला आहे. त्यांनी हेदेखील म्हटलं होतं की आपण लॉकडाउनचे नियम पाळले नाहीत तर आपला देश २१ वर्षे मागे जाईल.

भारतात एक हजार लोकांमागे एक आयसोलेशन बेडही नाही

भारतात एक हजार लोकांमागे एक आयसोलेशन बेड नाही ही देखील चिंतेची बाब आहे. भारताच्या आरोग्य व्यवस्थेवर आधीच ताण आहे. त्यात आता करोनाचं संकट समोर आलं आहे. फ्रान्स, दक्षिण कोरिया, चीन, इटली आणि अमेरिका या देशांच्या तुलनेत भारतात आयसोलेशन बेड्सची संख्या अगदीत नगण्य आहे. ही चिंतेची बाब आहे असंही वैज्ञानिकांनी म्हटलं आहे.

३० कोटी लोकांना हायपर टेन्शनचा त्रास

भारतात ३० कोटी लोकांना हायपर टेन्शनचा त्रास आहे. करोनाची लागण होण्यासाठी ही बाब पुरेशी आहे. हायपर टेन्शन असणाऱ्यांना करोनाची लागण होण्याचा धोका असतो. सध्या १० हजार भारतीय नागरिकांमागे ७० आयोसेलेशन बेड्स आहे. भारतात करोनाग्रस्तांची संखअया वाढली तर या देशातील आरोग्यसेवेवर प्रचंड ताण येईल असंही वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. दैनिक भास्करने या संदर्भातले वृत्त दिले आहे.