करोनाच्या दुसऱ्या लाटेनं आरोग्य व्यवस्था खिळखिळी करून ठेवली आहे. दररोज लाखो लोकांनाचा संसर्ग होत असून, हजारो लोकांचे बळी जात आहेत. देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकानं भयंकर स्थिती निर्माण झाली असून, अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या नागरिकांना दरवाजे बंद केले आहेत. इतर देशांपाठोपाठ अमेरिकेनंही भारतासोबतचा प्रवास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतात त्सुनामीसारखीच करोनाची दुसरी लाट आली आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकाप्रमाणेच भारतात रुग्णसंख्येचा विस्फोट झाला असून, बेड, ऑक्सिजन, औषधींसाठी रुग्ण आणि नातेवाईकांना हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत. स्मशानभूमींमध्येही अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या असून, देशातील या भयावह परिस्थितीनंतर अनेक देशांनी भारतातून येणाऱ्यांना प्रवेश बंदी वा निर्बंध लादले आहेत. इतर देशांपाठोपाठ अमेरिकेनंही भारतातून प्रवासी येणाऱ्या पायबंद घालण्यासाठी प्रवास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ४ मे पासून या निर्णय लागू होणार आहे.

व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव जेन साकी यांनी या निर्णयाची माहिती दिली. भारतातून येणाऱ्यांवर निर्बंध लागण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ४ मेपासून हा निर्णय लागू होईल. अमेरिकेच्या रोग प्रतिबंधक व नियंत्रण केंद्राने दिलेल्या सल्ल्यानंतर प्रशासनानं तातडीनं भारतातून येणाऱ्यांवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रचंड रुग्णवाढ झाली आहे आणि त्याचबरोबर विविध स्ट्रेन देशभरात पसरले असून, त्यापार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं जेन साकी यांनी सांगितलं.

अमेरिकेनं यापूर्वीच आपल्या नागरिकांना भारत दौरा टाळण्याचं आवाहन केलं होतं. लस घेतलेली असली, तरी अमेरिकनं नागरिकांनी भारतात जाणं टाळावं. फारच गरजेचं असेल तर लसीकरण पूर्ण झाल्यानंतरच जावं, असा सल्ला दिला होता. त्यानंतर आता भारतातून येणाऱ्यांवर आता निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ब्रिटन, इटली, जर्मनी, फ्रान्स, यूएई, पाकिस्तान आणि सिंगापूर या देशांनी भारतातून येणाऱ्यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.