देशात अशा काही संघटना आहेत, ज्यांचा देशाच्या स्वातंत्र चळवळीत काहीही सहभाग नव्हता, त्यांनी महात्मा गांधींनी चालवलेल्या चले जाव चळवळीलाही विरोध केला होता. अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडाडून हल्ला केला. त्या लोकसभेत बोलत होत्या. स्वातंत्र चळवळीतील महत्वाचा भाग असणाऱ्या 'चले जाव' चळवळीला आज ७५ वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त लोकसभेत विशेष सत्राचे आयोजन केले होते. सोनिया म्हणाल्या, सध्या देशात द्वेषाचे आणि बदल्याचे राजकारण केले जात आहे. यामध्ये खुला संवाद आणि चर्चेला स्थान नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यामुळे आज धर्मनिरपेक्षता आणि अभिव्यक्ती धोक्यात आली आहे. यालाच विभाजनाचे राजकारण म्हणतात. जर आपल्याला आपले स्वातंत्र टिकवायचे असेल तर आपल्याला अशा विरोधी शक्तींचा मुकाबला करायला हवा. स्वातंत्र्य चळवळीतील माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इतर काँग्रेस नेत्यांविषयी बोलताना सोनिया म्हणाल्या की, स्वातंत्र्य चळवळीदरम्यान पंडित नेहरुंनी जीवनातील बरीच वर्षे तुरुंगात घालवली. अनेक काँग्रेस नेत्यांचा तुरुंगातच मृत्यू झाला. इंग्रजांनी भारतातून निघून जावे यासाठी सुरु झालेल्या 'चले जाव' चळवळीत दरम्यान, आंदोलकांवर अनेक अत्याचार झाले. मात्र तरीही ते मागे हटले नाहीत. दुसऱ्या महायुद्धावेळी ८ ऑगस्ट १९४२ रोजी हे आंदेलन सुरु झाले होते. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुंबई अधिवेशनात महात्मा गांधींनी हे आंदोलन सुरु केले होते होते. त्यानंतर ९ ऑगस्ट १९४२ रोजी गांधीजींच्या आवाहनानुसार संपूर्ण देशभरात या आंदोलनाला सुरुवात झाली. भारताला तत्काळ स्वातंत्र्य मिळावे यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले होते.