हाथरस प्रकरणाच्या निमित्ताने जातीय दंगली भडकवण्याचा कट रचण्यात आल्याचा दावा उत्तर प्रदेशातील सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. एका अहवालानुसार एक बनावट वेबसाइट रात्रभरात तयार करण्यात आली आणि त्याद्वारे जातीय दंगली घडवण्याचा कट रचला गेला. justiceforhathrasvictim.cardd.co ही ती वेबसाइट आहे. या वेबसाइटवर हाथरस प्रकरणातील हिंसाचाराची आग भडकवण्यासाठी काय करावं आणि काय करु नये हे सविस्तरपणे सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

मदतीची नावाखाली हिंसाचार पसरवण्यासाठी निधीची व्यवस्था केली जात असल्याचीही माहिती मिळाली आहे. PFI, SDPI यासारख्या संघटनांनीही उत्तर प्रदेशात हिंसाचार पसरविण्यासाठी वेबसाइट तयार करण्यात समान भूमिका बजावली आहे.

आणखी वाचा- संवादातून समस्या सोडवण्याचं मुख्यमंत्री म्हणाले, मग…; प्रियंका गांधींचा योगींना सवाल

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल हाथरसमधील जमावाने हा राज्य सरकारविरोधात कट असल्याचं म्हटलं होतं. ते म्हणाले की ज्यांना विकास आवडत नाही, त्यांना जातीय हिंसा भडकवायची आहे. ज्यांना विकास आवडत नाही, त्यांना जातीय दंगल भडकवायची आहे आणि राज्यातही दंगलीच्या नावाखाली विकास थांबेल, त्यांना दंगलीच्या नावाखाली राजकारण करण्याची संधी मिळाली आहे म्हणून ते नवे कट रचत राहतात असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- सरकारनं हुकुमशाही व अहंकारी वृत्ती सोडावी, अन्यथा…; मायावतींचा योगी सरकारला सल्ला

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका दलित तरुणीवर बलात्कार झाला. त्यानंतर तिच्यावर हल्ला करुन तिची जीभ छाटण्यात आली. या मुलीवर सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र २९ सप्टेंबरच्या रात्री या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर पीडित मुलीच्या मृतदेहावर घाईने अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्यानंतर देशभरात या प्रकरणी प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. पीडितेच्या कुटुंबीयांनी दहशतीखाली असल्याची प्रतिक्रिया दिली होती. काँग्रेस नेते राहुल आणि प्रियंका गांधी यांना भेटू दिलं गेलं नाही. धक्काबुक्कीचाही आरोप झाला. त्यानंतर काँग्रेसने विविध ठिकाणी आंदोलनंही केली.

आता या प्रकरणी जातीय दंगली भडकवण्याचा कट रचण्यात आल्याचं सुरक्षा यंत्रणांनी सांगितलं आहे असं उत्तर प्रदेश सरकारने म्हटलं आहे.