शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकेचा भडीमार केला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपा आणि संघामुळेच हिंदुत्वाचं सर्वाधिक नुकसान झाल्याचं ते म्हणाले आहेत. सरसंघचालक मोहन भागवतांना हिंदुत्वाबाबत काहीही कळत नाही असं विधानही शंकाराचार्यांनी केलं. जे भारतात जन्माला आले ते हिंदू असं भागवत म्हणतात. मग, इंग्लंड आणि अमेरिकेत हिंदू माता-पित्यांच्या मुलांना काय म्हणायचं असा सवाल शंकराचार्यांनी विचारला.

इंडिया टुडेसोबत झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना शंकराचार्य म्हणाले, गोमांस निर्यात करण्यामध्ये भाजपाचे नेते अग्रेसर आहेत, भाजपाचे खायचे दात एक आणि दाखवायचे वेगळे आहेत. काश्मिरमध्ये आर्टिकल ३७० संपलं का ? तरुणांना रोजगार मिळाला का? पंतप्रधान मोदींनी दिलेल्या वचनाप्रमाणे प्रत्येकाच्या बॅंक खात्यात १५ लाख रुपये जमा झाले काय? अयोध्येत राम मंदिर झालं का? अशा एकाहून एक प्रश्नांचा भडीमार शकराचार्यांनी केला. करत मोदी आणि भाजपाने २०१४ मध्ये केलेले वादे भाजपाने देशाला केलेले वादे पूर्ण केले का असा सवाल त्यांनी विचारला.

बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेला आसाराम बापूवरही शंकराचार्यांनी प्रतिक्रिया दिली. आसारामला कायद्यानुसार शिक्षा झाली आहे. मात्र, धर्मानुसार शिक्षा मिळणं अजून बाकी आहे. केवळ आसाराम नव्हे तर त्याचा मुलगा नारायण साईलाही कठोर शिक्षा व्हायला हवी असं ते म्हणाले. जोपर्यंत जनता मुर्ख बनेल तोपर्यंत असे लोक फायदा उचलत राहणार. धार्मिक संघटनांवर कर लावण्याच्या मुद्यावर बोलताना शंकराचार्य म्हणाले, सरकारने पहिले स्वतःच्या खर्चावर लक्ष द्यायला हवं. खासदार-आमदारांनी स्वतःची वेतन कपात करावी असं शकराचार्य म्हणाले.