मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांबाबत शरद पवारही आपली भूमिका बदलतील आणि आपल्या शेतकऱ्यांना या कायद्यांचे फायदे समजावून सांगतील, असा विश्वास केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी व्यक्त केला आहे. शरद पवार यांनी कालच मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांमधील तरतुदी आणि पवार कृषीमंत्री असताना कायद्यात सुचवलेले बदल यांची तुलनात्मक समिक्षा केली होती. त्यानंतर तोमर यांनी आपलं मत मांडलं आहे.

तोमर म्हणाले, “शरद पवार हे अनुभवी राजकीय नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री आहेत. त्यांना कृषी क्षेत्रातील समस्या आणि त्यावरील उपाययोजनांची चांगली जाण आहे. त्यांनी स्वतः कृषी सुधारणा घडवून आणण्यासाठी कठोर प्रयत्न केले आहेत. पवारांसारखे अनुभवी नेतेही नव्या कृषी कायद्यांतील तथ्यांबाबत चुकीची माहिती देत होते. मात्र, आता त्यांच्याकडे खरी माहिती आहे. मला आशा आहे की ते आपली भूमिका बदलतील आणि आपल्या शेतकऱ्यांना या कायद्यांचे फायदे समजावून सांगतील.”

नवे कृषी कायदे शेतकऱ्यांना आपला माल कोणालाही आणि कुठेही विकण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध करुन देतात. आपल्या राज्याबाहेरही त्यांना माल विकता येणार असून त्याबदल्यात त्यांना चांगली किंमतही मिळेल. याचा सध्याच्या किमान आधारभूत किंमत व्यवस्थेवर परिणाम होणार नाही. नव्या कायद्यांमुळे बाजार समित्यांवरही परिणाम होणार नाही. उलट यामुळे अधिक स्पर्धा निर्माण होईल तसेच सेवा आणि पायाभूत सुविधा निर्माण होतील. यामध्ये दोन्हीही व्यवस्था कायम राहतील, असंही तोमर यांनी म्हटलं आहे.