माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी त्यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यूशी त्यांचा जो संबंध जोडला त्याबाबत ते प्रसारमाध्यमांवर संतापले आहेत. प्रसारमाध्यमांनी याबाबत कपोलकल्पित बातम्या दिल्या व आपल्या चौकशीसंदर्भात खोटय़ा तपशिलाच्या आधारे माहिती दिली असा आरोप त्यांनी केला. त्यांनी व्यक्त केलेला संताप हा विशेषत्वाने केरळातील वृत्तवाहिन्यांनी दिेलेल्या बातम्यांच्यासंदर्भात होता.
काँग्रेसचे खासदार असलेले शशी थरूर यांनी सांगितले की, केरळच्या वाहिन्यांवर खोटय़ा बातम्या देण्यात आल्या. बातम्या कपोलकल्पित होत्या व कुठल्याही आधाराशिवाय पोलिसांचे हवाले दिले गेले. आपल्या देशाला जास्त चांगल्या व प्रामाणिक पत्रकारितेची गरज आहे, खोटय़ा किंवा टीआरपी वाढवणाऱ्या बातम्यांची अपेक्षा नाही. आपल्या राज्यात आपण माध्यमांनी वृत्तपत्रस्वातंत्र्याचे महत्त्व अशा पद्धतीने कमी केले आहे. त्यांनी ट्विटरवर असे चित्र दाखवले आहे की, त्यात ‘कॉशन- द मीडिया इज नॉट रिफ्लेक्षन ऑफ रिअ‍ॅलिटी’ असे बॅनर दाखवले आहे. योग्य उत्तरे न दिल्याबाबत नवी दिल्ली पोलिसांनी थरूर यांना फटकारले, विशेष चौकशी पथकाने त्यांना अनेक प्रकारचे प्रश्न विचारले होते असे बातम्यांमध्ये सांगण्यात आले; त्यावर थरूर यांनी म्हटले आहे की, जर तसे असते तर पोलिसांनीच प्रसारमाध्यमांना प्रथम माहिती दिली असती. या सर्व बातम्या निराधार आहेत. आपण चौकशीत पूर्ण सहकार्य करीत आहोत.
थरूर हे शुक्रवारी तिरूअनंतपुरमला पोहोचले व तेथे त्यांनी मतदारसंघात पाच दिवस कार्यक्रम ठेवले आहेत. दिल्ली पोलिसांनी मात्र असे म्हटले आहे की, थरूर यांनी दिल्ली सोडून जायला नको होते.