शत्रुघ्न सिन्हा यांचा हल्ला

भाजपवर सातत्याने टीका करणारे पक्षाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी गुरुवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढविला. लालकृष्ण अडवाणी, यशवंत सिन्हा, अरुण शौरी आदी ज्येष्ठ नेत्यांचा सल्ला आणि आशीर्वाद घेण्याची वेळ आली आहे, संवादच साधावयाचा असल्यास पक्षातील या ज्येष्ठ नेत्यांपासून सुरुवात करा, असा उपरोधिक सल्ला शत्रुघ्न सिन्हा यांनी दिला आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्वीट करून मोदी आणि भाजपच्या नेत्यांवर टीका केली आहे. राजकीय सल्लागार आणि सुरक्षा सल्लागार आपल्याला वास्तवतेपासून दूर ठेवत आहेत, असे सिन्हा यांनी मोदी यांना सांगितले आहे. तुम्ही नेहमी संवादावर भर देत असल्याने आता पक्षातील जुन्या नेत्यांपासून संवादाला सुरुवात करा, असा उपरोधिक सल्ला सिन्हा यांनी दिला आहे.

अडवाणी, यशवंत सिन्हा, अरुण शौरी यांच्यासारख्या नेत्यांचे आशीर्वाद घेण्याची वेळ आली आहे, तर कीर्ती आझाद यांच्यासारख्या सहकाऱ्याची गळाभेट घेण्याचीही वेळ आली आहे, कोणीच कधीही कायमस्वरूपी जेता राहिलेला नाही हे इतिहासातील उदाहरणांवरून दिसून येई, असा टोलाही शत्रुघ्न सिन्हा यांनी लगावला आहे.