भारतातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रमुख उद्योगपतींचा सहभाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जागतिक पातळीवरील अनेक नेत्यांच्या उपस्थितीत येथे तीन दिवसांच्या उच्चस्तरीय आर्थिक शिखर परिषदेत १५ अब्ज डॉलरहून अधिक रकमेच्या २३ गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचे मंगळवारी सौदी अरेबियाने जाहीर केले.

सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांच्या पुढाकाराने ‘दाव्होस इन द डेझर्ट’ या भविष्यातील गुंतवणूक पुढाकार कार्यक्रमात हे करार करण्यात आले. मोहम्मद बिन सलमान यांनी ‘व्हिजन २०३०’ योजना आखली आहे, त्यानुसार केवळ पेट्रोलियम उत्पादनांवर अवलंबित्व कमी करतानाच सौदीच्या अर्थव्यवस्थेमध्ये वैविध्यता आणण्याचे ठरविले आहे.

एकूण १५ अब्ज डॉलरहून अधिक मूल्य असलेले करार रियाधमधील रिट्झ-कार्लटन हॉटेलमध्ये करण्यात आले. सौदी अरेबियाने जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांसमोर जे प्रस्ताव ठेवले आहेत त्याचे प्रतिबिंब करारांमध्ये आहे, असे द सौदी अरेबियन जनरल इन्व्हेस्टमेण्ट अ‍ॅथॉरिटीने (एसएजीआयए) एका निवेदनात म्हटले आहे. तीन दिवसांच्या या शिखर परिषदेत सरकार, वित्तपुरवठादार, उद्योग क्षेत्रातील बडे नेते सहभागी होणार असून ते आगामी दशकात जागतिक व्यापार, संधी, आणि आव्हाने या बाबत चर्चा करणार आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले की, भारतातील युवक हे आमचे मुख्य सामर्थ्य आहे. या परिषदेमध्ये अमेरिकेचे अर्थमंत्री स्टीव्हन मृचीन, ऊर्जामंत्री रिक पेरी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार आणि जावई जेअर्ड कुशनर हेही सहभागी झाले आहेत.

भारताच्या अग्रक्रमांवर मोदींचे भाषण

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रियाधमध्ये सोमवारी रात्री आगमन झाले. आर्थिक  शिखर परिषदेच्या व्यासपीठावर मोदींचे मुख्य भाषण होणार असून ‘व्हॉट्स नेक्स्ट फॉर इंडिया’ असे त्याचे शीर्षक आहे. जागतिक गुंतवणूकदारांसाठी भारतातील वाढता व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधी यावर आपण बोलणार आहोत, कारण २०२४ पर्यंत भारत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल करीत आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.

भारतातील मंदी तात्पुरती- मुकेश अंबानी

भारतीय अर्थव्यवस्थेतील मंदी ही तात्पुरती आहे, केंद्र सरकारने अलीकडेच हाती घेतलेल्या उपाययोजनांमुळे येत्या काही दिवसांतच स्थिती पूर्वपदावर येण्यास मदत होईल, असे उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मंगळवारी येथे सांगितले. ‘दाव्होस इन द डेझर्ट’ या वार्षिक गुंतवणूक व्यासपीठावरून अंबानी पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ऑगस्टपासून हाती घेतलेल्या उपाययोजनांची येत्या काही दिवसांत फळे मिळतील. भारतीय अर्थव्यवस्थेत मंदी आहे, मात्र ती तात्पुरती आहे असे आपले मत असल्याचे अंबानी म्हणाले.