महाराष्ट्रातील शिरुर मतदारसंघातून निवडणून गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात सरकारने शिवाजी महाराजांच्या धोरणाचा अवलंब करावा अशी मागणी केली. मंगळवारी लोकसभेमध्ये बोलातना कोल्हे यांनी शिवाजी महाराजांच्या वचनाचा दाखला देत केंद्र सरकारनेही शेतकऱ्यांसंदर्भात महाराजांच्या धोरणांच्या आधारावरच ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. लोकसभेत बोलताना कोल्हे यांनी शेतकरी आत्महत्या, ग्रामीण रोजगार, ग्रामीण पर्यटन या प्रश्नांवरुन आकडेवारी मांडत सरकारच्या शेतकरी धोरणांसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. 'शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका असं शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं. शेतकऱ्यांसंदर्भात सरकारकडून आम्हाला तशीच अपेक्षा आहे. शेतीसंदर्भातील प्रश्नांवर काहीतरी ठोस उपाययोजना केल्या जातील अशी आम्हाला अपेक्षा आहे' अशी अपेक्षा कोल्हे यांनी आपल्या भाषणादरम्यान व्यक्त केली. शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती खूपच वाईट असल्याचेही कोल्हे यांनी यावेळी बोलताना सांगितले. 'दरवेळी प्रश्न उत्तराच्या तासात शेतीसंदर्भात प्रश्न विचारले जातात तेव्हा दरवेळी शेतकऱ्यांना सहा हजार दिले जातील असेच उत्तर दिले जाते. मात्र आज शेतकऱ्याला दिवसाला १७ रुपये रोजगार मिळतो. हे १७ रुपये म्हणजे त्यांचा सन्मान आणि की चेष्ठा हेच कळत नाही. तसेच सहा हजार वर्षाला दिले तरी ५०० रुपये महिना हा हिशेबाने घर चालवता येते का? ५०० रुपये महिना दिल्यास शेतीची देखभाल करणे शक्य आहे का?' असा सवाल कोल्हे यांनी लोकसभेत उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्याची आकडेवारी सादर करत कोल्हे यांनी पाच ट्रिलीयन अर्थव्यवस्थेबरोबरच शेतकऱ्यांकडेही सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी केली. 'एकीकडे आपण पाच ट्रिलीयन अर्थव्यवस्थेच्या गप्पा मारतो. देशाची अर्थव्यस्था पाचव्या क्रमांकावर असेल चौथ्या क्रमांकावर असेल अशा गप्पा आपण मारत असतानाच दुसरीकडे सर्वात लाजीरवाणी गोष्ट म्हणजे केवळ महाराष्ट्रामध्ये २०१५ ते २०१८ या काळात एकूण १२ हजार २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. म्हणजेच २०१५ ते २०१८ या काळात महाराष्ट्रात रोज आठ शेतकरी आमत्महत्या करतायत. त्यामुळे आज शेतकऱ्यांच्या मुलांना आपली अर्थव्यवस्था पाचव्या किंवा चौथ्या स्थानावर आहे असं सांगून मिठाई खायला दिली तर ते माझा बाप परत घेऊन या असं आपल्याला सांगतील' अशा शब्दात कोल्हे यांनी सरकारी धोरणांवर टिका केली.