उत्तर प्रदेश शिवसेनेने चेतन चौहान यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशातील मंत्री चेतन चौहान यांचे काही दिवसांपूर्वी करोनाने निधन झाले होते. चौहान यांना लखनऊच्या सरकारी रूग्णालयातून गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात का हलविण्यात आले असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
करोनाची लागण झाल्यानंतर चौहान यांना सुरुवातीला, लखनऊमधील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एसजीपीजीआय) मध्ये दाखल केले होते. त्यानंतर त्यांच्या किडन्या निकामी झाल्यामुळे चौहान यांना गुरुग्राममधील मेदांता या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.
“मंत्री चेतन चौहान यांना लखनऊमधील एसजीपीजीआय रुग्णालयातून गुरुग्रामच्या मेदांता या खाजगी रुग्णालयात का दाखल केले गेले, एसजीपीजीआय या प्रतिष्ठित संस्थेवर सरकारचा विश्वास नव्हता का? ” असा सवाल शिवसेनेने निवेदनाद्वारे केला आहे.
एसजीपीजीआय रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचार्यांच्या वर्तणुकीवर चौहान यांनी नाराजी दर्शवली होती. अद्यापही रुग्णालयाच्या दोषी डॉक्टर व कर्मचार्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. करोनामुळे राज्यातील दोन मंत्र्यांचा मृत्यू झाल्यानंतर ही सरकार झोपा काढत आहे असेही या निवेदनात म्हटंले आहे. यापूर्वी २ ऑगस्ट रोजी, उत्तर प्रदेशच्या तंत्रशिक्षण मंत्री कमला राणी वरुण यांचेही करोनाने निधन झाले आहे.
दरम्यान, समाजवादी पक्षाचे विधान परिषदेचे आमदार सुनीलसिंह साजन यांनीही चौहान यांचा मृत्यू करोनामुळे नाही तर एसजीपीजीआय रुग्णालयात उपचारात झालेल्या निष्काळजीपणामुळे झाला आहे असा आरोप केला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 25, 2020 12:03 pm