मुसलमान समाजात जागरूकता होत आहे. राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढत आहे. त्याच वेळेला ‘मरकज’सारखे काही घडवले जाते आणि या सर्व प्रयत्नांवर पाणी पडते. दिल्लीतील ‘मरकज’ने हिंदू-मुसलमान असा खेळ करणाऱ्यांना आयतेच कोलीत दिले आहे. येथील अज्ञानी मुसलमानांनी निदान ‘मक्का-मदिने’कडून तरी काही शहाणपण घ्यावे, असं म्हणत शिवसेनेनं या संपूर्ण प्रकारावर टीका केली आहे.

संपूर्ण देशात कोरोनाच्या भीतीने घरात बसला आहे. पंतप्रधान मोदींच्या आदेशाने ‘लॉक डाऊन’ झाला आहे. पण दिल्लीच्या निजामुद्दीन येथे जमलेल्या मुसलमान झुंडीने देशावरील संकटात आणि चिंतेत भर टाकली आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून या प्रकारावर निशाणा साधला आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात ?
दिल्लीतील निजामुद्दीन भागात तबलीगी समाजाचा ‘मरकज’ नावाचा धार्मिक कार्यक्रम १ ते १५ मार्चच्या दरम्यान झाला. या कार्यक्रमासाठी देशातील २२ राज्यांमधून आणि जगातील ८ देशांतून ५ हजारांवर लोक जमले होते. त्यातील ३८० लोक आता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने देशात हडकंप माजला आहे. या ५ हजारांच्या जमावात २ हजार परदेशी नागरिक होते. सारा देश कोरोनाच्या चिंतेने ग्रासला असताना, दिल्लीसारख्या शहरात ‘गर्दी’ आणि ‘झुंडी’ जमा करण्यावर निर्बंध लादलेले असताना ५ हजार लोक धर्माच्या नावाखाली जमले त्यामुळे त्याचा व्हायचा तोच परिणाम अखेर झाला. निजामुद्दीन परिसरात जमलेल्या या धार्मिक झुंडीने देशाला ३८० कोरोनाग्रस्तांचा ‘नजराणा’ पेश केला आहे. हा सर्व प्रकार म्हणजे अक्षम्य बेफिकीरी व धर्मांध मस्तवालपणाचा नमुना आहे.

‘मरकज’निमित्ताने जे लोक तेथे जमले त्यांनी राष्ट्राची व समाजाची अशी काय सेवा केली? किंबहुना नुकसानच केले. एका बाजूला देशातील सर्वच धार्मिक स्थळे गर्दी टाळण्यासाठी बंद केली असताना ‘इस्लाम’च्या नावाखाली इतके लोक जमणे हे अमानुष आहे. दुबई, कुवैत, बहरीन, सौदी अरब अशा देशांमध्येही मशिदी बंद केल्या आहेत. लोकांनी घरच्या घरीच नमाज पठण करावे असे फर्मान तेथील राज्यकर्त्यांनी काढले आहे. तेदेखील मुसलमानच आहेत आणि इस्लामचे बंदे आहेत. तेथे राष्ट्रीय व सामाजिक सुरक्षेसाठी मशिदी व सार्वजनिक नमाजावर बंदी येऊनही ‘इस्लाम’ संकटात आल्याची बांग कोणी ठोकलेली नाही, पण दिल्लीत ‘मरकज’ची यात्रा घडली नसती तर धर्मावर काय मोठे आकाश कोसळले असते?

दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल लागताच पोलिसांनी शाहीन बाग परिसर रिकामा केला. तसाच बळाचा वापर करून हे ‘मरकज’ही रोखता आले असते. हा प्रश्न धार्मिक नसून राष्ट्राच्या आरोग्यविषयक सुरक्षेचा आहे आणि मुसलमान समाजातील लोकही या कारवाईच्या मागे ठामपणे उभे राहिले असते. ‘मरकज’साठी आलेल्या बेपर्वा तबलिगींनी आपापल्या राज्यांत परतताना ५ रेल्वे गाड्यांनी प्रवास केला. त्यातील काही लोक महाराष्ट्रातही आले. म्हणजे गाडीतील असंख्य लोकांना त्यांनी विनाकारण संकटात टाकले. खरे तर जे ‘मरकज’ला गेले त्यांनी स्वत:हूनच पुढे यायला हवे. त्यात लपविण्यासारखे काय आहे? ताप, सर्दी, खोकलाच आहे. फक्त संसर्गजन्य असल्याने काळजी घ्यायची आहे इतकेच. जे हे लपवतात, ते देशाला फसवतात हे लक्षात घ्या. देशातील धर्मांध मुसलमानांच्या या प्रवृत्तीमुळेच येथे अनेकदा संघर्षाच्या ठिणग्या पडतात. त्यांच्याशी कठोरपणे वागावे तर त्यांना येथे असुरक्षित असल्याची भावना उफाळून येते आणि प्रेमाने वागावे तर ‘मरकज’सारखी प्रकरणे घडतात.