नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन (CAB) शिवसेनेचे भांगडा राजकारण सुरु आहे अशी बोचरी टीका एआयएमआयएमचे खासदार असद्दुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हातमिळवणी करत त्यांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली तेव्हा सेनेने सेक्युलर हा शब्द त्यांच्या किमान समान कार्यक्रमात लिहिला. मात्र हे बिल धर्मनिरपेक्षतेविरोधात आहे. त्यामुळेच शिवसेनेने या विधेयकावरुन शिवसेनेचे भांगडा पॉलिटिक्स सुरु आहे अशी बोचरी टीका ओवेसी यांनी केली आहे. शिवसेनेचे राजकारण हे संधीसाधू आहे अशीही टीका त्यांनी केली.

नागरिकत्व सुधारणा विधेयक सोमवारी लोकसभेत बहुमतानं मंजुर झालं, यावेळी शिवसेनेनेही याला पाठींबा दिला होता. यावर काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी यावर स्पष्टीकरण दिलं होतं. नागरिकत्व सुधारणा विधेयक देशहिताचं असल्यानं शिवसेनेनं त्याला पाठींबा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केलं होतं.

“राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यात आला. हा कार्यक्रम विचारधारांसाठी तयार केलेला कार्यक्रम आहे. मात्र, नागरिकत्व सुधारणा विधेयक हे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशहितासाठी आणण्यात आलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीयत्वाला धरुन ते असल्याने शिवसेनेने याला पाठींबा दिला आहे,” असंही ते म्हणाले होते.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आम्हाला कोणी काय करायचं ते शिकवू नये असं म्हटलं होतं. तसंच नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाबाबत जोवर स्पष्टता येणार नाही, तोवर त्याला पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. मात्र शिवसेना भांगडा पॉलिटिक्स करत असल्याची टीका ओवेसी यांनी केली आहे.