आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात शिवसेना उतरणार असल्याची घोषणा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. आपल्या ट्विटर हँडलवरुन त्यांनी ही माहिती दिली. So, here is the much awaited update. After discussions with Party Chief Shri Uddhav Thackeray, Shivsena has decided to contest the West Bengal Assembly Elections. We are reaching Kolkata soon.!! Jai Hind, জয় বাংলা ! — Sanjay Raut (@rautsanjay61) January 17, 2021 राऊत म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आम्ही लवकरच कोलकात्यात येत आहोत, असा संदेशही राऊत यांनी यावर दिला. तसेच शेवटी बंगाली भाषेत 'जय हिंद' अशी घोषणाही त्यांनी केली. या महत्वपूर्ण घोषणेद्वारे संजय राउत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतरावरुन वाक् युद्ध सुरु आहे. काँग्रेसला कुठल्याच स्वरुपातील नामांतराची भूमिका मान्य नाही. तर शिवसेना औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. संजय राऊत यांनी आजच्या सामनातील लेखातून काँग्रेसवर धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावरुन निशाणा साधला. तर त्याला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी एका सविस्तर पत्राद्वारे शिवसेनेने काँग्रेसला धर्मनिरपेक्षता शिकवू नये असा टोला लगावला.