बिहारमध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्तेच्या दिशेने घोडदौड सुरु आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांनी यावेळी माजी मुख्यमंत्री आणि बिहार निवडणुकीची जबाबदारी खांद्यावर असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत यांनी यावेळी तेजस्वी कुमार यांचंही अभिनंदन केलं असून त्यांनी पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांच्या तोंडाला फेस आणल्याचं म्हटलं आहे.

फडणवीसांचं अभिनंदन करताना संजय राऊत यांनी सांगितलं की, “नक्कीच…जे जिंकले त्यांचं अभिनंदन करण्याची आमची परंपरा आहे. फडणवीस बिहारचे प्रमुख होते. त्यांना महाराष्ट्राचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी येथून बिहारमधील सूत्रं नक्कीच हलवली असतील. संपूर्ण केंद्रीय सत्ता तिथे कामाला लागली होती. मोदींनी १७ ते १८ सभा घेतल्या. तरीही ३० वर्षांचे तेजस्वी यांनी सर्वांना कामाला लावलं. तोंडाला फेस आणला हे मान्य करावं लागेल”.

“ज्या पक्षाचा नेता तीनवेळा मुख्यमंत्री राहिला असेल आणि तिसऱ्या क्रमांकावर जात असेल तर विचार करण्याची गरज आहे. याबद्दल आत्मचिंतन, विश्लेषण केलं पाहिजे. विकासाचा मुद्दा योग्य असल्याचं जनतेने दाखवून दिलं आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

आणखी वाचा- Bihar election : १२८ जागांवर NDA ने आघाडी घेतल्याचे कल

“बिहारमध्ये भाजपाचे नेते नितीश कुमार मुख्यमंत्री होतील असं एका सूरात सांगत आहेत. यासाठी नितीश कुमार यांनी शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत. कारण जो खेळ महाराष्ट्रात खेळण्याचा प्रयत्न झाला. त्यावर आम्ही जो पलटवार केला त्यानंतर भाजपा आपल्या मित्रांशी तसं करणार नाही. शब्द फिरवल्यानंतर काय होऊ शकतं हे महाराष्ट्राने दाखवून दिलं आहे. नितीश कुमार मुख्यमंत्री होतील आणि भाजपाला त्यांना करावंच लागेल,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- समजून घ्या: बिहार निवडणुकीचा निकाल येण्यासाठी रात्र उजाडणार; हे आहे कारण

“राजकारणात आता कोणतीही नैतिकता नाही, तसं असतं तर महाराष्ट्रातही राजकारण बदललं असतं. महाराष्ट्रातल्या कोणत्याही आत्महत्या किंवा मृत्यूचा फायदा कोणाला झाला असं वाटत नाही. तेजस्वी यांनी प्रचारात जी उसळी घेतली आणि विकास, शिक्षण, बेराजगाराचा मुद्दा आणला त्यानंतर सगळे मुद्दे मागे पडले. शिक्षण, विकास, रोजगार, आरोग्य यावर प्रचारात चर्चा झाली याचं श्रेय तेजस्वी यादव यांनाच जातं. काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली असती तर तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे असते,” असं संजय राऊत यांनी सांगितलं. तेजस्वी यादव यांना मदत करता आली तर पहावी अशी शिवसेनेची भूमिका होती असंही यावेळी ते म्हणाले.

आणखी वाचा- “पृथ्वीवरुन चांद्रयान नियंत्रित होतं, मग ईव्हीएम हॅक होणं शक्य नाही का?”

“७० जागा अशा आहेत जिथे ३० ते ४० टक्के मतमोजणी झाली आहे. रात्री १०-११ पर्यंत पूर्ण चित्र स्पष्ट होईल. एनडीएच्या बाजूने निकाल जातोय हे सध्या स्पष्ट दिसतंय. नितीश कुमार तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. भाजपा पहिल्या क्रमांकावर असून ‘मॅन ऑफ द मॅच’ तेजस्वी यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे. लोकशाहीत असे निकाल येत असतात. जेव्हा पूर्ण निकाल हाती येतील तेव्हा त्यावर भाष्य करणं जास्त महत्वाचं आहे,” असंही ते म्हणाले.

“कधी कधी लोक सामना हारतात. पण हारणाऱ्या संघाच्या खेळाडूला संघर्ष करत संघाला पुढे नेल्याबद्दल ‘मॅन ऑफ द मॅच’ दिलं जातं. बिहार निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्यासारखा एक चेहरा राष्ट्रीय राजकारणातील नवा चेहरा म्हणून पुढे आला आहे. ३० वर्षाचा एक तरुण ज्याच्या जवळ कोणी मदतीला नाही, मित्रपक्षांचं समर्थन नाही, कुटंबाचा पाठिंबा नाही, केंद्रात विरोधी पक्ष आहेत अशा प्रतिकूल परिस्थितीत प्रधानमंत्र्यांपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत एकटा लढत असेल आणि निवडणूक आपल्याभोवती आणत असेल तर बिहारला एका नवा राजकीय चेहरा मिळाला आहे. यावर आगामी दिवसात विश्वस ठेवून भविष्य पाहू शकतो,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी कौतुक केलं आहे.