भारताच्या पश्चिमी क्षेत्रातील सर्व हवाई तळांना संरक्षण मंत्रालयाकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. या भागात भारतीय सैन्याचे तब्बल ५४-५५ हवाई तळ असून याठिकाणी लष्कराची महत्त्वपूर्ण साधनसामुग्री आहे. त्यामुळे या हवाई तळ क्षेत्रांच्या परिसरात कोणतीही व्यक्ती अनधिकृतरित्या घुसखोरी करताना आढळल्यास दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. पठाणकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून संरक्षण क्षेत्रांच्या सुरक्षेसाठी नव्याने काही गोष्टी ठरवण्यात येत आहेत. याशिवाय, भविष्यात कोणत्याही हल्ल्याला त्वरीत प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य आणि केंद्रीय निमलष्करी दलांचा एकत्रितपणे सराव सुरू असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली.