कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर नाखूष असल्याने सिक्कीम सरकारने पाच दिवसांचा आठवडा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने पाच आठवड्याची सुविधा पूर्णपणे रद्द केली असून दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी आदेशानुसार, १ एप्रिलपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.

गतवर्षी मे महिन्यात सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री प्रेमसिंह तमंग यांनी सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला होता. याआधी कर्मचाऱ्यांसाठी सहा दिवसांचा आठवडा होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांना पाच दिवसांच्या आठवड्याची सुविधा देऊनही त्यांची कामगिरी न सुधारल्याने सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा सरकार नाराज होतं.

सरकारने २८ मे २०१९ मधील आदेशात बदल केला आहे. मुख्य सचिव एस सी गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२० पासून नव्या निर्णयाची अमलबजावणी होणार आहे. राज्यातील सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कार्यालयांना दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी मिळणार आहे.