राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. करोना आणि बिहार सरकारमध्ये साम्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

“करोना आणि बिहार सरकारमध्ये काही समानता आहे. दोघेही जनतेच्या जीवासाठी घातकर आहेत आणि दोन्ही अदृश्य (दिसून येत नाही) आहेत.” असं ट्विट लालू प्रसाद यादव यांनी केलेलं आहे.

या अगोदर बक्सरमधील चौसा येथे नदीत आढळून आलेल्या मृतदेहांवरून देखील लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका केलेली आहे. ”जिवंतपणी औषध, ऑक्सिजन, बेड आणि उपचार नाही दिले. मृत्यूनंतर लाकडं, दोन फूट कापड आणि जमीन देखील नशीबी आली नाही. मृतदेहांना गंगेत फेकण्यात आलं. जंगली प्राणी मृतदेहांची लचके तोडत आहेत. हिंदुंचं दफन केलं जात आहे, कुठं घेऊन जात आहात देशाल व मानवतेला?” असं त्यांनी ट्विटद्वारे म्हटलं होतं.

देशातील १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाची जबाबदारी राज्यांवर सोपवण्यात आली आहे. मात्र हे लसीकरण आणि लसींचा तुटवडा यावरुन वाद सुरु आहेत. यावरून देखील लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक सल्ला दिला देखील दिलेला आहे.

“आम्ही विश्वविक्रम केलेला, आजच्या विश्वगुरु सरकारने लोकांकडून पैसे घेऊनही…”; लालूंनी लसीकरणावरुन मोदींना सुनावलं

लालू यांनी ट्विटरवरुन तीन ट्विट केले आहेत. यामध्ये त्यांनी, १९९६-९७ च्या कालावधीची आठवण करुन दिलीय. “१९९६-९७ मध्ये जेव्हा समाजवाद्यांनी देशामध्ये जनता दलची सरकार स्थापन केली होती तेव्हा मी राष्ट्रीय अध्यक्ष होतो. तेव्हा आम्ही पोलिओ लसीकरणाचा विश्वविक्रम केला होता. त्यावेळी आज सारख्या सुविधाही उपलब्ध नव्हत्या. इतक्या मोठ्यप्रमाणात जनजागृतीही करण्यात आली नव्हती तरी ७ डिसेंबर १९९६ रोजी आम्ही ११ कोटी ७४ लाख आणि १८ जानेवारी १९९७ ला १२ कोटी ७३ लाख लहान मुलांना पोलिओची लस दिली होती,” असं लालू यांनी म्हटलं आहे.