लॉकडाउनमुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अर्थव्यवस्थेसंदर्भातही अनेक तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. असे असतानाच दुसरीकडे पंजाबमधील एका मिठाईच्या दुकानाच्या मलकाला गणेशोत्सवाआधीच बाप्पा पावला आहे. गुरुवारी पंजाब स्टेट राखी बंपर लॉटरी निकाल जाहीर झाले आणि हा मिठाईवाला करोडपती झाला. शुक्रवारी सकाळी या निकालांबद्दल लॉटरीचे तिकीट काढणाऱ्या धर्मपाल यांना सजलं. त्यांनी आपलं तिकीट तपासून पाहिलं तेव्हा त्यांना चक्क दीड करोड रुपयांची लॉटरी लागली होती. पाहता पाहात धर्मपाल यांना लॉटरी लागल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्यांचे अभिनंद करण्यासाठी दुकानावर ओळखीच्या लोकांची आणि नातेवाईकांची रांगच लागली. नक्की वाचा >> मध्य प्रदेश : लॉकडाउनदरम्यान खाणीत काम करताना सापडला हिरा, किंमत पाहून व्हाल थक्क "काही दिवसांपूर्वीच आपण हे लॉटरीचं तिकीट काढलं होतं. एवढी मोठी लॉटरी जिंकल्याने माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे," असं मत धर्मपाल यांनी व्यक्त केलं. या पैशांपैकी काही पैसे गरीबांना दान म्हणून देणार असल्याचेही धर्मपालने सांगितलं. धर्मपालचे दुकान असणाऱ्या कलावाली बाजारपेठेमधील एखाद्या दुकानदाराला दीड कोटींची लॉटरी लागण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी एका भाजीवाल्याला आणि किराणा मालाचे दुकान चालवणाऱ्याला अशीच लॉटरी लागली होती. प्रेम स्वीट्सचे मालक असणाऱ्य धर्मपाल आणि देवीलाल यांनी न्यूज १८ हिंदीला दिलेल्या माहितीनुसार एक आठवड्यापूर्वी त्यांनी सिरसा येथील एका लॉटरी तिकीट विक्रेत्याच्या माध्यमातून राखी बंपर लॉटरीची तिकीटं विकत घेतली होती. दोघांनी मिळून पाच तिकीटं विकत घेतली होती. त्यानंतर पाच दिवसांनी हाच तिकीट विक्रेता त्यांच्या दुकानावर आला आणि एकच तिकीट उरलं आहे ते ही तुम्ही विकत घ्या असं सांगू लागला. त्यावेळी धर्मपाल आणि देवीलाल यांनी हे शेवटचं तिकीटही विकत घेतलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजेच याच तिकीटाला दीड कोटींची लॉटरी लागली. नक्की वाचा >> याला म्हणतात नशीब… ‘या’ अनमोल गोष्टींमुळे रातोरात झाला २५ कोटींचा मालक गुरुवारी रात्री या तिकीट विक्रेत्याने धर्मपाल यांना फोन करुन तुम्हाला दीड कोटींची लॉटरी लागली आहे असं सांगितलं. आधी यावर धर्मपाल यांचा विश्वासच बसला नाही. त्यांनी याकडे काहीसं दूर्लक्ष केलं. त्यानंतर शुक्रवारी या विक्रेत्याने पुन्हा धर्ममपाल यांना फोन करुन दीड कोटींची लॉटरी लागलेल्या तिकीटाचा क्रमांक सांगितला. आपण घेतलेलं शेवटच्या तिकीटाचा हाच क्रमांक असल्याचे पाहिल्यावर धर्मपाल यांना धक्काच आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी घरातल्यांना याबद्दल सांगितल्यावर सर्वांनी एकच जल्लोष केला.