संसदेत आम्ही सदस्यत्त्वाची शपथ घेत असताना काही खासदार जय श्रीरामचे नारे जोर जोरात देत होते. जय श्रीरामचे नारे देण्यासाठी संसद ही योग्य जागा नाही. त्याचासाठी मंदिरं आहेत. सगळे देव एकच आहेत यावर माझा विश्वास आहे. मात्र जय श्रीरामचे नारे संसदेत देणं योग्य नाही अशी भूमिका महाराष्ट्रातल्या खासदार नवनीत कौर राणा यांनी घेतली आहे. नवनीत कौर राणा या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष आमदार आहेत. त्या अमरावतीतून निवडून आल्या आहेत.

आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून हे पहिलंच अधिवेशन आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला ३०३ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपा सहीत घटकपक्षांना म्हणजेच एनडीएला ३५० पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. आज अर्थसंकल्प अधिवेशनाच्या वेळी सगळ्याच सदस्यांनी शपथ घेतली.

याच शपथविधीच्या वेळी जय श्रीरामचे नारे देण्यात आले आहेत. ज्यावर नवनीत कौर राणा यांनी आक्षेप घेतला आहे. मी सगळ्या देवांना मानते. सगळे देव एकच आहेत या मताची मी आहे. मात्र कुणाला तरी लक्ष्य करण्यासाठी जय श्रीरामचे नारे द्यायचे ही बाब योग्य नाही असे नवनीत कौर राणा यांनी म्हटले आहे. आता नवनीत राणा कौर यांनी जी मागणी केली आहे त्यावर सरकारतर्फे त्यांना उत्तर दिलं जाणार की येत्या काळातही अशी घोषणाबाजी केली जाणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.