हिमालयातील हिमनद्या एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून दुप्पट वेगाने वितळत असून वाढते तापमान हे त्याचे कारण आहे. हिमनद्यातील बर्फाचे प्रमाण कमी होत असून वर्षाला निम्मे बर्फ कमी होत आहे. त्यामुळे भारतासह काही देशांना होणारा पाणीपुरवठा धोक्यात येऊ शकतो, असे २०१९ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अहवालात म्हटले आहे. सुमारे चाळीस वर्षे भारत, चीन, नेपाळ, भूतान या देशांचा उपग्रहांच्या मदतीने अभ्यास करण्यात आला. त्यात हवामान बदलांमुळे हिमालयातील हिमनद्या वितळत असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘सायन्स’ या नियतकालिकात जून २०१९ मध्ये प्रकाशित शोधनिबंधात म्हटले आहे, की हिमनद्या इ.स २००० पासून वितळत चालल्या असून वर्षाला एक फूट बर्फ कमी होत आहे. हिमनद्या वितळण्याचे प्रमाण दुप्पट झाले असून १९७५ ते २००० या काळात हे प्रमाण कमी होते. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील विद्यार्थी जोशुआ मॉरर यांनी सांगितले, की हिमालयातील नद्या वितळत असल्याचे चित्र सामोरे आले असून विशिष्ट काळात हे प्रमाण जास्त होत गेले आहे. गेल्या चार दशकात हिमनद्यांची अवस्था बिघडली आहे. उपग्रहांच्या निरीक्षणातून ही बाब सिद्ध झाली आहे. ठिकठिकाणी तापमान वेगवेगळे असते, पण इ.स. २०००ते इ.स २०१६ या काळात तापमान सरासरी एक अंश सेल्सियसने वाढले असून ते १९७५ -२००० या काळात कमी होते. संशोधकांनी उपग्रह प्रतिमांच्या अभ्यासातून असे सांगितले, की पश्चिम ते पूर्व या भागात २००० कि.मी पर्यंत हिमनद्या पसरलेल्या असल्या तरी आता त्या आक्रसत आहेत. विसाव्या शतकात अमेरिकी हेर उपग्रहांनीही काही छायाचित्रे घेतली. त्यातून काही त्रिमितीय प्रारूपे तयार करण्यात आली. त्यातून हिमनद्यांचे स्वरूप कसे बदलत गेले हे स्पष्ट होते. १९७५ ते २००० या काळात दरवर्षी हिमनद्यांनी ०.२५ मीटर बर्फ पातळी गमावली. याचे कारण वाढलेले तापमान हे होते. १९९० पासून तापमान वाढीस सुरूवात झाली, त्यानंतर इ.स २००० च्या सुमारास अर्धा मीटर बर्फ दरवर्षी नष्ट होत गेले. आशियातील लोक जीवाश्म इंधने, जैवभार यांचा वापर करतात. त्यामुळे प्रदूषणकारी वायू पसरून तापमानवाढ होते.