नवी दिल्ली : सामाजिक तेढ, आर्थिक मंदी आणि जागतिक पातळीवरील साथीचे रोग यापासून भारताला धोका असल्याचा इशारा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी शुक्रवारी दिला. या धोक्यांमुळे केवळ भारताच्या आत्म्यालाच धोका पोहोचत नसून भारताच्या जागतिक स्थानाचीही घसरण होत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

आपल्याला माहिती असलेला आणि आपल्या हृदयात असलेला भारत झपाटय़ाने खालावत चालला आहे आणि स्थिती गंभीर आणि खिन्नतेची झाली आहे, असा इशारा डॉ. सिंग यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या लेखात दिला आहे. देशापुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी डॉ. सिंग यांनी सल्ला देण्याची तयारी दर्शविली असून त्याला तीन सूत्री योजना असे म्हटले आहे. करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने सर्व शक्ती आणि प्रयत्नांवर भर द्यावा, नागरिकत्व कायदा मागे घ्यावा अथवा सुधारणा करावी आणि अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रेरणादायी योजना आखावी, असे त्यांनी म्हटले आहे.