भारतीयांनी चीनी वस्तुंच्या वापरावर बहिष्कार टाकला पाहिजे असं मत व्यक्त करणारे प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी आपला दुसरा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी पहिल्यांदा केलेल्या व्हिडिओवर उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिली आहेत. चीनवर बहिष्कार घालणं खरचं शक्य आहे का?, लोकांनी का पुढाकार घ्यावा? तसेच चीनी सामानाशिवाय आपण काम करु शकतो का? यासारख्या काही महत्वाच्या प्रश्नांची वांगचुक यांनी उत्तरं दिली आहेत. चला तर बघुयात काय आहे त्याचे म्हणणे…

प्रश्न:
आपण म्हणजेच सामान्य व्यक्तींनी का बहिष्कार घालण्यासाठी पुढाकार घ्यायचा. सरकारच चीनी वस्तुंच्या आयातीवर निर्बंध का घालत नाही?

वांगचुक यांचे उत्तर:
सरकारला असा निर्णय घेताना काही नियम आणि कायद्यांचे पालन करावं लागतं, दोन्ही देशामधील संबंधांचा विचार करावा लागतो. यामध्ये अनेक गोष्टी असतात. त्यामुळे सरकारला थेट आयातीवर बंदी घालणं कठीण असू शकतं. मात्र जनतेने काही निर्बंध स्वत: लादून घेतले. तर जनतेला निवडीचा हक्क असतो. ग्राहक हाच राजा असतो यानुसार जगातील कोणताही देश तुम्ही ही गोष्ट का विकत घेत आहात ही का नाही घेत असा प्रश्न विचारु शकत नाही. आपण सरकारची का वाट बघावी. जर लोकं काही करु लागली तर सरकारकडूनही लोकांच्या वागण्यानुसार आणि इच्छेनुसारच धोरणे ठरवली आणि बनवली जातात. तुमचा देश तुमच्यासाठी काय करतो हे विचारण्याऐवजी तुम्ही तुमच्या देशासाठी काय करता हे स्वत:ला विचारा, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कॅनडी यांनी म्हटलं होतं.

नक्की वाचा >> ‘रिमुव्ह चायना अ‍ॅप’ नक्की आहे तरी काय? अन् कसं काम करतं?

प्रश्न:
चीनसारख्या मोठ्या देशातील सामानावर बहिष्कार घालणं शक्य आहे का?

वांगचुक यांचे उत्तर:
जर एखादा देश अत्याचार कर असेल, पिळवणूक करत असेल तर का करु नये. जनतेमध्ये इच्छाशक्ती असेल तर हे शक्य आहे. अरब देशामध्ये क्रांती झाली होती तेव्हा त्या क्रांतीचा उद्रेक एका भाजीविक्रेत्यामुळे झाला होता. पाच ते सहा देशामधील हुमशाही सरकारे बघता बघता पडली होती. मग आपल्या देशाच्या दरवाजावर एवढे अत्याचार आणि पिळवणूक होत असेल तर आपण का नाही असं काम करु शकत?, आपल्याकडे बाकी काही नसलं तरी आपले पाकीट तर आहे. ग्राहक हा राजा असतो हे लक्षात ठेवायला हवं.

प्रश्न:
चीनवर बहिष्कार का टाकायचा? हे द्वेष परसवण्यासारखं नाही का?

वांगचुक यांचे उत्तर:
हा द्वेष पसरवण्याचा निक्कीच प्रयत्न नाही. आपल्याला चीनी लोकांशी काहीही अडचण नाहीय. माझे अनेक मित्र आहेत चीनमध्ये. आपल्याला अडचण आहे चीन सरकारबरोबर आणि त्यांच्या धोरणांशी. चीन सरकारचे धोरण विस्तावरवादी आणि शोषण करणारे आहे. चीनच्या प्रत्येक गोष्टीवर जग शांत राहतं. त्यामुळे बहिष्कार टाकण्याचे जे आवाहन आहे तो एक गजर (सावध होण्याचा इशारा) आहे जो आपण जगाला देत आहोत. चीनमध्ये १४० कोटी मजूर राबतायत बंदिस्तांप्रमाणे त्यांच्याकडून काम करुन घेतलं जातं. कोणी काही बोललं की त्याला गायब केलं जातं. पण जग शांत आहे कारण त्यांना चीनबरोबर व्यापार करायचा आहे. चीनमध्ये ६० लाखांपैकी १२ लाख तिबेटी बौद्ध धर्मिय मारले गेले. सहा हजार मंदीर आणि मठ तोडण्यात आले. तरी जग शांत आहे कारण आपल्याला चीनबरोबर उद्योग व्यवसाय करायचा आहे. युगुर्र मुसलीमांबद्दल बोलायचं झालं तर त्यांची लोकसंख्या एक कोटी असून त्यापैकी १० लाख लोकं तुरुंगामध्ये बंदिस्त आहेत. हजारो मशिदी तोडण्यात आल्या आहेत. कारण जग व्यापार करण्याच्याच गोष्टी करतं चीनबरोबरच. श्रीलंकाच बघा चीनच्या कर्जाखाली दाबला गेला आहे. तेथील अमंतोता बंदर तर चीनच्या ताब्यात गेलं आहे. पाकिस्तान तर चीनने दिलेल्या कर्जात एवढा अडकला आहे की हा देशही एखाद्या गुलामाप्रमाणे होणार आहे. असं असलं तरी जग शांत कारण व्यापार करायचा आहे.

नक्की वाचा >> “तुम्ही ‘मेड इन चायना’वर खर्च करणारा प्रत्येक पैसा भारतीय सैन्याविरोधात वापरला जाईल”

ही झाली जगाची गोष्ट पण माझ्यासाठी महत्वाचं काय आहे भारताच्या दाराजवळ काय होतं आहे. लडाखमध्ये चीन १९६२ पासून किती किमी आतमध्ये आला आहे. आमच्या इकडचे गुरं चारणारे लोकांची हक्काची कुरणं त्यात गेली आहेत. कुठे घेऊन जाणार ते त्यांच्या गुरांना आणि बकऱ्यांना. याबद्दल कोणीच काही बोलत नाही जग शांत आहे कारण आपल्याला व्यापार करायचा आहे. आपण त्यांना वाटेल तसं वागू देत आहोत. ते आपल्या सैनिकांना येऊन धक्काबुक्की करतात. असं असतानाच आपण त्यांना, “वो बेदर्दी से सर काटे मेरा और मे कहू उनसे हुजूर आहिस्ता आहिस्ता… जनाब आहिस्ता आहिस्ता..” एवढचं सांगायचं का? तर नाही आपल्याला असं सांगता येणार नाही आता आपल्याला उत्तर द्यायला हवं. आणि हे उत्तर आपण पाकिटाच्या माध्यमातून द्यायला हवं. अनेकदा निर्बंध वापरले जातात. एखादा देश चुकीचं काही करतो तेव्हा निर्बंध टाकले जातात. त्याच प्रकारे आपण आपल्या स्तरावर निर्बंध टाकायला हवेत. आपल्याला बहिष्कार टाकणं काही नवं नाही. आपण सर्वांनीच इतिहासामधील स्वदेशी मोहिम म्हणजेच ब्रिटीश मालावर बंदी घालण्याच्या मोहीमेसंदर्भात ऐकलं असेल. १०९५ पासून लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश सरकारविरोधात हे आंदोलन सुरु झालं होतं. त्यावेळी आपण ब्रिटीश सरकारचे गुलाम झालो होतो. आता आपल्याला समजायचं हवं की रोग होऊ नये यासंदर्भातील काळजी घेणं हे रोगापेक्षा अधिक फायद्याचं आहे. त्यामुळे आपण आतापासूनच बहिष्कार घालण्यास सुरुवात केली पाहिजे. उलट आपण काहीही न करता पाहत राहिलो तर तो गुन्हा ठरेल. अत्याचार करणं हा गुन्हा आहे तर अत्याचार सहन करणंही गुन्हाच आहे.

प्रश्न:
चीनी सामानाशिवाय आपण काम करु शकतो का? अनेक वस्तूंमधील भाग हे चीनमधील असतात? चीनी सामान नाही तर त्याला पर्याय काय?

वांगचुक यांचे उत्तर:
आपण चीनी सामानामध्ये बुडत चाललो आहोत. हे वेग एवढा आहे की जसं काही आपल्या हातात काहीच नाहीय असं आपण वागतोय. आयुष्य हे अर्थव्यवस्थेसारखे नसते. नियमांचाही जीवनामध्ये आधार घ्यावा लागतो. चांगलं काय वाईट काय यामधला फरकही आपल्याला कळला पाहिजे. आपले संस्कार आणि धर्म आपल्याला वाईट, चुकीच्या आणि पापाशी संदर्भात गोष्टींपासून राहण्याची शिकवण देतात. उदाहरण सांगायचं झाल्यास मुसलीम बांधव मद्यसेवन करत नाहीत. शिख बांधव सिगरेट आणि तंबाखूपासूनच दूर राहतात. हिंदू बांधव गोमांस खात नाहीत. जैन धर्मिय तर मांसच नाही पण कांदा, लसूणसारख्या गोष्टींपासूनही दूर राहतात. ते लोकं या गोष्टी नाही खात. त्यामुळे कुठेही प्रवासाला गेल्यावर हे लोकं उपाशी राहतात का? तर नाही. कारण या लोकांचा दृढ निश्चय एवढा आहे की आता तशी एक इको सिस्टीम तयार झाली आहे. आज अनेक जागी जैन फूड मिळतं. याचप्रमाणे आपण चीनी सामान हे गुन्ह्याशी जोडलेले आहे असं समजून चाललो तर एक दोन वर्षामध्ये आपल्या देशामध्ये तसेच इतर देशामध्ये सर्व पर्यायी वस्तू बनू लागतील आणि आपल्याला चीनी सामान आठवणार पण नाही.

त्यामुळेच मी सांगतो की सॉफ्टवेअर आठवड्याभरामध्ये वापरणं बंद करा, हार्डवेअर एका वर्षात बंद करा. हार्डवेअरमध्ये पण कमी आवश्यक आणि पर्यायी वस्तू वर्षभरात. दोन वर्षांमध्ये वस्तूच्या आतील भाग आणि अत्यावश्यक वस्तूंचा वापर बंद करुन पर्याय शोधणं शक्य आहे. योग्य योजना बनवून काम केलं तर आपण हे करु शकतो. उद्या किंवा परवाच सगळं वापरायचं थांबवा असं शक्य नाही. तसेच आपण सध्या वापरत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा पर्याय आपल्याला हवाच आहे असं नाही. आपण कमीत कमी वस्तू वापरुन, आपल्या गरजा मर्यादित ठेऊन आयुष्य सुंदर पद्धतीने जगू शकतो.