पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मला अनेक विषयांवर बोलायचे होते. मात्र, वारंवार त्यांच्या भेटीची वेळ मागूनही ते मला एकदाही भेटले नाहीत. त्यामुळेच मी माझे विचार जनतेसमोर मांडण्याचा निर्णय घेतला आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी सांगितले. ते जबलपूरमधील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, आता वरिष्ठ आणि महत्त्वाच्या नेत्यांना भेटायलाही पक्षाध्यक्षांना वेळ मिळत नाही. त्यामुळं १३ महिने झाले तरी मला भेटीची वेळ मिळू शकली नाही, याचं आश्चर्य वाटत नाही. १३ महिन्यांपूर्वी मी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मोदींच्या भेटीची वेळ मागितली होती. ती अद्यापही मिळू शकली नाही. त्यामुळं आता मी यावर कुणाशीही चर्चा करणार नाही. जे बोलायचे ते जाहीरपणे बोलणार असल्याचे सिन्हा यांनी म्हटले.

आताचा भाजप पक्ष अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांच्या काळातील राहिलेला नाही. त्यांच्या काळात पक्षाचा तळागाळातील कार्यकर्ताही दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्ष आडवाणींची भेट घेऊ शकत होता, असे सांगत त्यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी अमित शहा मोदींना लाडू भरवत असतानाच्या एका छायाचित्रावरूनही टिप्पणी केली. या छायाचित्रात व्यासपीठावर राजनाथ सिंह, अनंत कुमार, सुषमा स्वराज आणि अन्य नेते दिसत नाहीत. मात्र, अडवाणी छायाचित्रात कुठेच दिसत नाहीत. ते आता ‘महत्त्वाचे’ कार्यकर्ते राहिले नसून ‘सामान्य’ कार्यकर्ते झाले आहेत, असे उपरोधिक वक्तव्य सिन्हा यांनी केले.

मोदींच्या काळात काश्मीरची भारताशी नाळ तुटली- यशवंत सिन्हा

याशिवाय, त्यांनी शेतीविषयक धोरणांवरूनही सरकारला लक्ष्य केले. मध्य प्रदेश सरकारला कृषी क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल मिळालेल्या पुरस्काराविषयी त्यांनी शंका उपस्थित केली. मध्य प्रदेश सरकारला हा पुरस्कार आकडेवारीच्या जोरावर मिळाला. मला आतापर्यंतच्या कारकीर्दीत अशा आकडेवारीमागील गुपिते ठाऊक झाली आहेत. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी मध्य प्रदेश सरकारनं सुरू केलेली भावांतर योजना आणि मोदींनी सुरू केलेली पीक विमा योजना या बिनकामाच्या आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

धोरण-धरसोडीमुळे ‘मेक इन इंडिया’ संकटात