“पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चीनने बेकायदरित्या बळकावलेला आपला भूभाग आपण परत मिळवत नाही, तो पर्यंत शहीद झालेल्या २० जवानांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही” असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

सध्या सुरु असलेल्या भारत-चीन तणावाबद्दल अरविंद केजरीवाल यांना त्यांची भूमिका विचारली असता ते म्हणाले की, “चीनवर संपूर्ण देश संतप्त असून सैन्याच्या पाठिशी उभा आहे. संपूर्ण देश केंद्र सरकारचे समर्थन करतोय. आपण तो भूभाग परत मिळवला नाही तर गलवान खोऱ्यातील संघर्षात शहीद झालेल्या २० जवानांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही” असे केजरीवाल म्हणाले.

आणखी वाचा- ‘या’ मुद्द्यावर मायावतींनी दिला भाजपाला जाहीर पाठिंबा

‘काहीही करुन आपल्याला तो भूभाग परत मिळवावा लागेल’ असे केजरीवाल म्हणाले. १९६२ साली सुद्धा भारताने मैत्रीचा हात पुढे केला होता. पण चीनने विश्वासघात केला. मागच्या काही वर्षात भारत-चीन संबंधात परिस्थिती बदलेली नाही असे केजरीवाल म्हणाले.

आणखी वाचा- ‘परिणामांचा विचार केल्यास, पुढे जाणे शक्य नाही’ मोदी सरकारची चीनच्या विषयावर स्पष्ट भूमिका

आता आपल्याला रणनिती बदलावी लागेल. आपण मैत्रीचा हात पुढे करत असलो तरी आपल्याला सतर्क रहावे लागेल. ते पुन्हा फसवणूक करु शकतात असे केजरीवाल म्हणाले.