माझ्यावर करण्यात आलेले आरोप आणि माझ्या कुटुंबीयांविरुद्ध रचण्यात आलेले कट-कारस्थान हे उत्तरेच्या क्रिकेट संघटनांच्या गटाचे काम असून दक्षिण भारतीयांना आणि खासकरून तामिळींना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असे मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी व्यक्त केले आहे.
जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी ‘बीसीसीआयमध्ये उत्तर भारतीय गट दक्षिण भारतीय गटाला लक्ष्य करत आहे’ असा आरोप ट्विटरवर केला होता. याबद्दल श्रीनिवासन यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘हो नक्कीच, हे उघड सत्य आहे. दक्षिण भारतीयांविरुद्ध कारस्थाने होत आहेत.’
आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंग प्रकरण आणि जावई गुरुनाथ मयप्पनवर करण्यात आलेल्या सट्टेबाजीच्या आरोपामुळे बीसीसीआयच्या कार्यकारिणीच्या बैठकीत श्रीनिवासन यांना आपले अधिकार गमवावे लागले होते आणि त्यांच्या जागी हंगामी अध्यक्ष म्हणून जगमोहन दालमिया यांची नियुक्ती करण्यात आली होती. याबाबत श्रीनिवासन यांनी सांगितले की, ‘‘माझ्याविरोधात कोणतेही आरोप नाहीत, पण बीसीसीआयमधील ‘त्या’ गटाला अध्यक्षपद मिळवायचे होते, पण त्यामध्ये ते अयशस्वी ठरले. ते यापलीकडे जाऊन मला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत होते. मी कितीही प्रश्नांना उत्तर द्यायला तयार आहे.’’