श्रीलंकेतील राजकीय घडामोडींनी शुक्रवारी नाट्यमय वळण घेतले. महिंदा राजपक्षे यांनी शुक्रवारी पंतप्रधानपदाची शपथ घेतली असून राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी रनिल विक्रमसिंघे यांच्या पक्षासोबतची युती तोडून राजपक्षे यांची पंतप्रधानपदी नेमणूक केली. विशेष म्हणजे २०१५ मध्ये सिरीसेना हे राजपक्षे यांचा पराभव करत राष्ट्रपतीपदावर विराजमान झाले होते. राजपक्षे हे चीनधार्जिणे असून या घडामोडींकडे भारताचेही लक्ष लागले आहे.

श्रीलंकेत शुक्रवारी राजकीय पटलावर नाट्यमय घडामोडी घडल्या. श्रीलंकेचे राष्ट्रपती सिरीसेना यांच्या युनायटेड पीपल्स फ्रिडम अलायन्सने रनिल विक्रमसिंघे यांच्या युनायटेड नॅशनल पार्टीसोबतच्या आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. यानंतर सिरीसेना यांनी पंतप्रधानपदी महिंदा राजपक्षे यांची नियुक्ती केली. राजपक्षे यांनी विक्रमसिंघे यांची जागा घेतली आहे. सिरीसेना आणि विक्रमसिंघे यांच्यातील तणावपूर्ण संबंधामुळे या घडामोडी घडल्या. राजपक्षे यांचा पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळाही पार पडला आहे.

विक्रमसिंघे यांनी राजपक्षे यांची नेमणूक घटनाबाह्य असल्याचा दावा केला आहे. मीच पंतप्रधानपदी कायम असल्याचे त्यांनी सांगितले. सिरीसेना यांचा हा निर्णय वादग्रस्त ठरण्याचीही शक्यता आहे. राजपक्षे आणि सिरीसेना यांच्या आघाडीकडे एकूण ९५ जागा आहेत. त्यांना बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. दुसरीकडे विक्रमसिंघे यांच्या पक्षाकडे १०६ जागा असून बहुमतापासून ते फक्त सात जागा दूर आहे.

कट्टरवैरी ते पुन्हा सत्तेतील वाटेकरी
२०१५ मध्ये जवळपास एक दशक सत्ता उपभोगणारे महिंदा राजपक्षे यांचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सिरीसेना यांनी पराभव केला होता. सिरीसेना हे राजपक्षे यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत आरोग्यमंत्री होते. तसेच सत्ताधारी श्रीलंका फ्रिडम पार्टीचे ते सरचिटणीसही होते. मात्र, राजपक्षे यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर त्यांनी पक्षत्याग केला. २०१५ मधील निवडणुकीत त्यांनी राजपक्षेंचा पराभव करत राष्ट्रपतीपदही मिळवले होते. महिंदा राजपक्षे यांच्याविरोधात विक्रमसिंघे आणि सिरीसेना हे एकत्र आले होते.