अमली पदार्थाच्या तस्करीवरून श्रीलंकेत फाशीची शिक्षा झालेल्या पाच भारतीय मच्छीमारांची राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी दयेचा अर्ज मंजूर केल्यावर सुटका करण्यात आली आहे. या पाचही मच्छीमारांना इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या हवाली करण्यात आल्याची माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनी दिली. 

इमर्सन, पी ऑगस्टस, आर. विल्सन, के प्रसाद व जे लँगल्ट या तामिळनाडूच्या पाच मच्छीमारांना २०११ मध्ये अटक करण्यात आली होती. अमली पदार्थाच्या तस्करीच्या आरोपावरून ३० ऑक्टोबरला कोलंबो उच्च न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्याचे पडसाद रामेश्वरम व आसपासच्या परिसरात उमटून वांशिक दंगली भडकल्या होत्या.