तेलंगणातील श्रीशैलम जलविद्युत प्रकल्पात गुरूवारी मध्यरात्री अचानक आगीचा भडका उडाला होता. प्रकल्पाच्या पॉवर हाऊसमध्येच भीषण आग लागली होती. या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यानं ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. रात्री आगीची घटना कळाल्यानंतर एनडीआरएफच्या तुकडीला पाचारण करण्यात आलं होतं. त्यानंतर आगीत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, ९ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात जवानांचे प्रयत्न अपयशी ठरले. तेलंगणा व आंध्र प्रदेशच्या सीमा भागात असलेल्या श्रीशैलम जलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पातील पॉवर हाऊसमध्ये गुरूवारी मध्यरात्री अचानक आग लागली. यावेळी तिथे १९ कर्मचारी होते. मात्र, ९ कर्मचारी आगीमुळे अडकून पडले. या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आलं. बचाव मोहीम हाती घेण्यात आली. मात्र, शुक्रवारी दुपारी आधी सहा तर थोड्या वेळानं आणखी तीन जणांचे मृतदेह जवानांना मिळाले. ९ जणांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. ९ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, तिघांची ओळख पटली आहे. तिघेही सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत होते. सुंदर नाईक, मोहन कुमार आणि फातिमा अशी ओळख पटलेल्या तीन मृतांची नावं आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बचाव मोहीम अजूनही सुरू आहे. लेफ्ट बँक पॉवर स्टेशनमध्ये तीन कर्मचारी अडकलेले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. #UPDATE Nine persons trapped inside the Left Bank Power House in Srisailam, in Telangana side, have lost their lives in the fire accident: Telangana State Power Generation Corporation Limited — ANI (@ANI) August 21, 2020 जलविद्युत प्रकल्पामध्ये झालेल्या अग्नितांडवाच्या घटनेची तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी गंभीर दखल घेतली आहे. राव यांनी या घटनेचा तपास सीआयडीकडे देण्याचे आदेश दिले आहे. सीआयडीचे अतिरिक्त संचालक गोविंद सिंह यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राव यांनी घटनेत मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांबद्दल शोक व्यक्त केला. "ही घटना दुर्दैवी आहे. अडकून पडलेल्या कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी पूर्ण ताकदीनं प्रयत्न करण्यात आले, पण त्यांचा दुःखद अंत झाला," असं राव यांनी म्हटलं आहे.