रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर केलेल्या ट्विटमुळे स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणार कामरा अडचणीत आला असून अवमान खटला दाखल करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अ‍ॅटर्नी जनरल के के वेणुगोपाळ यांनी मान्यता दिली आहे. यानंतर कुणाल कामरा याने ट्विट करत आपली बाजू मांडली असून पुन्हा एकदा उपहासात्मकपणे टीका केली आहे. त्याने ट्विटरला एक पोस्ट शेअर केली असून ना वकील, ना माफी, ना दंड अशी कॅप्शन दिली आहे.

कुणाल कामराने ट्विटमध्ये काय म्हटलं आहे –
“मी केलेलं ट्विट सुप्रीम कोर्टाचा अवमान करत असल्याचं आढळलं आहे. मी जे ट्विट केलं होतं ते माझं सुप्रीम कोर्टाने प्राइम टाइम लाऊडस्पीकरविरोधात दिलेल्या एकतर्फी निर्णयावरील मत होतं,” असं कुणाल कामराने म्हटलं आहे. कुणाल कामराने यावेळी माफी मागण्यास नकार दिला असून, “माझं मत अद्यापही तेच असून इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने बाळगलेलं मौन टीका न करता दुर्लक्षित केलं जाऊ शकत नाही,” असं म्हटलं आहे.

कुणाल कामराने यावेळी आपल्यावरील खटल्याचा वेळ माझ्याइतकं महत्त्व आणि संधी न मिळालेल्या इतर महत्वाच्या प्रकरणांना द्यावा असंही म्हटलं आहे. यावेळी त्याने काही प्रकरणांचा उल्लेखही केला आहे. “माझी वेळ इतर महत्त्वाच्या मुद्द्यांना दिली तर आभाळ कोसळेल का?,” असंही कुणाल कामराने विचारलं आहे.

“सुप्रीम कोर्टाने अद्याप माझ्या ट्विटसंबंधी काही जाहीर केलेलं नाही. पण जेव्हा कधी करतील तेव्हा ते हसतील,” अशी आशा कुणाल कामराने व्यक्त केली आहे. यावेळी कुणाल कामराने आपण एका ट्विटमध्ये सुप्रीम कोर्टात महात्मा गांधींच्या ऐवजी हरिश साळवे यांचा फोटो लावावा अशी मागणी केल्याची आठवण करुन देत पंडित जवाहरलाल नेहरुंच्या जागी महेश जेठमलानी यांचा फोटो लावण्याची मागणी केली आहे.

आणखी वाचा- सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी कुणाल कामराविरोधात खटला दाखल होणार

काय आहे प्रकरण?
सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात खटला दाखल होणार आहे. त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी दिले आहेत. रिपलब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर ट्विट करताना स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने न्या. चंद्रचूड आणि सुप्रीम कोर्टाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यासंदर्भातली काही ट्विट्सही केली. ज्यानंतर पुण्यातल्या काही वकिलांनी अॅटर्नी जनरल यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली. आता अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी कुणाल कामराविरोधात खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

काय म्हणाला होता कुणाल कामरा?
कुणालने न्या. चंद्रचूड यांची तुलना विमानातील कर्मचाऱ्यांशी केली होती. न्या. चंद्रचूड हे विमानातील कर्मचाऱ्याप्रमाणे आहेत जे प्रथम दर्जातील प्रवाशांना शॅम्पेन सर्व्ह करत आहेत. मात्र दुसरीकडे सर्वसामान्यांना विमानात प्रवेश मिळेल की नाही हे ही ठाऊक नाही, असं ट्विट कुणाल कामराने केलं होतं. अन्य एका ट्विटमध्ये कुणालने, वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला आणि न्यायमुर्तींना सन्माननीय म्हणणे सोडून द्यावे कारण सन्मान त्या वास्तूमधून कधीच निघून गेला आहे, अशी टीका केली होती. याचबरोबर कुणालने इतरही काही ट्विट केले होते ज्यामधून त्याने सर्वोच्च न्यायालय आणि भाजपावर टीका केली होती.

के के वेणुगोपाळ यांनी कारवाईला मान्यता देताना काय म्हटलं
“कामरा याने केलेली ट्विट्स अनुचित होती. सुप्रीम कोर्टावर निर्लज्जपणे टीका केल्यास शिक्षा भोगावी लागेल हे जनतेला कळण्याची वेळ आता आली आहे,” असं वेणुगोपाळ यांनी म्हटलं आहे. ठअभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेऊन आपण सुप्रीम कोर्टावर निर्लज्जपणे टीका करु शकतो असं जनतेला वाटतं, मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेऊन कायद्याचा अपमान करण्याची अनुमती घटनेने दिलेली नाही,” असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.