देशातील जनता वीज आणि महागाईच्या संकटाला सामोरी जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानमध्ये जाऊन ड्रम वाजविण्यास व्यस्त असल्याची खोचक टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
ते म्हणाले की, “मोदी सरकारला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. दिलेल्या आश्वासनांचा आता त्यांना विसर पडला आहे. त्यामुळे जपानमध्ये जाऊन ड्रम वाजवत बसण्यापेक्षा आधी देशातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष द्या.” असे राहुल गांधी म्हणाले. भ्रष्टाचार आणि इतर मुद्द्यांवर मोदी सरकारने निवडणूक काळात जनतेची दिशाभूल करून फसविले असल्याचा आरोपही यावेळी राहुल गांधी यांनी केला. ते अमेठीमध्ये बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या काँग्रेसच्या पराभवावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, की अशा घटना घडत असतात. आम्ही त्यावर मात करुन दाखवू असा विश्वासही राहुल यांनी व्यक्त केला.