श्रीनगरच्या वर्दळीच्या बटामालू भागात शनिवारी पोलिसांशी झालेल्या संघर्षांत एक नागरिक ठार झाल्याच्या अफवेमुळे चिडून रस्त्यांवर उतरलेल्या निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडाव्या लागल्या.
बटामालू भागाचा रहिवासी असलेल्या एका व्यक्तीचा कुठल्यातरी मुद्दय़ावरून एका पोलीस उपनिरीक्षकाशी वाद झाला व त्यातून भांडण उद्भवले. यात पोलीस अधिकाऱ्याच्या डोक्याला जखमा झाल्या, तर नागरिक बेशुद्ध पडला. दोघांनाही नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
या नागरिकाला नंतर ‘खबरदारीचा उपाय’ म्हणून एसएमएचएस रुग्णालयात हलवण्यात आले व त्याची प्रकृती स्थिर आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.