आंध्र प्रदेशच्या प्रस्तावित विभाजनाला विरोध करण्यासाठी येथील विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी मंगळवारी मोर्चा काढला होता. संतप्त विद्यार्थ्यांनी  इंदिरा गांधी महापालिका स्टेडियमबाहेर अर्धा तास रास्ता रोकोही केला.
विद्यार्थी संयुक्त कृती समितीच्या बॅनरखाली विविध महाविद्यालयांमधील जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून निदर्शने केली. कोटय़वधी तेलुगु जनतेच्या भावनांना तिलांजली देऊन राजकीय स्वार्थ साधणाऱ्या मूठभर नेत्यांसाठी राज्याचे विभाजन करू नये, असे आवाहन युवानेता देविनेनी अविनाश यांनी केले आहे.
प्रस्तावित विभाजनाच्या निषेधार्थ सर्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी आपापल्या पदांचे राजीनामे द्यावेत, असे आवाहनही या वेळी करण्यात आले. या मोर्चात सहभागी होऊन सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील कर्मचारी, कामगार संघटना आणि वकिलांनीही पाठिंबा दर्शविला आहे.