मुंबईतील आरे वृक्षतोडप्रकरणी कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी थेट सरन्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. याची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली असून उद्या (७ ऑक्टोबर) सकाळी यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष उद्या सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे लागले आहे.

कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना रविवारी सकाळी आरे वृक्षतोडप्रकरणी एक पत्र लिहिले होते. यामध्ये सुप्रीम कोर्टाने मुंबईतील आरे प्रकरणाची दखल घेत यामध्ये हस्तक्षेप करावा. तसेच मुंबई महापालिका, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि मुंबई पोलिसांकडून सुरु असलेल्या आरेमधील वृक्षतोडीला स्थगिती देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.

आरेतील वृक्षतोडीला जनतेचा सातत्याने होत असलेला विरोध लक्षात घेत आणि विद्यार्थ्यांनी पाठवलेले पत्र याची दखल घेत. सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी सुओमोटो याचिका दाखल करुन घेतली असून उद्या (७ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता विशेष खंडपीठासमोर यावर सुनावणी होणार आहे.

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण असून त्यात आरे प्रकरणावरून राजकारणाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून यावर काय निर्णय येतो याची सर्वांना उत्सुकता आहे.