ज्या गुन्हेगारांना ठोठावण्यात आलेली मृत्युदंडाची शिक्षा जन्मठेपेत परावर्तित करण्यात आली आहे आणि अशा गुन्हेगारांपैकी ज्यांची अशी शिक्षा निकाल लागण्यापूर्वीच भोगून झालेली आहे, अशांना मुक्त करण्याचा वा त्यांच्या शिक्षेत सूट देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे किंवा कसे या प्रश्नावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. या याचिकेवरील सुनावणीस बुधवारी सुरुवात झाली. राजीव गांधी हत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या सातही गुन्हेगारांना मुक्त करण्याचा निर्णय नुकताच तामिळनाडू सरकारने घेतला होता तर या निर्णयाला केंद्राने आव्हान दिले होते.भारताचे सरन्यायाधीश आर.एम.लोढा यांच्या नेतृत्वाखालील पाच जणांच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. या घटनापीठामध्ये न्या. जे.एस.शेखर, न्या. जे. चेलामेश्वर, न्या. ए. के. सिक्री आणि न्या रोहिंटन नरिमन यांचा समावेश आहे. या सुनावणीसाठी दोन दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात यावा, अशी सरन्यायाधीशांची इच्छा होती. मात्र, केंद्र सरकारचे वकील सॉलिसीटर जनरल रणजित कुमार यांनी या प्रकरणात अनेक गुंतागुंतीचे विषय असल्यामुळे घाईघाईने सुनावणी घेणे संयुक्तिक ठरणार नाही, असे मत मांडले.९ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची शिक्षा कमी करण्यास सर्व राज्यांना मज्जाव केला होता. तसेच अशी सुटका करण्यासाठी केंद्र सरकारची पूर्वपरवानगी अनिवार्य असावी का, याविषयी राज्यांची मतेही मागवली होती.घटनापीठासमोरील प्रश्न*देहदंडाची शिक्षा जन्मठेपेत परावर्तित केल्यानंतर जन्मठेप म्हणजे १४ वर्षांचा कारावास की आयुष्यभराचा कारावास याचा निर्णय घेणे गरजेचे*गुन्हेगारांना अशी सूट देण्याचा किंवा त्यांना मुक्त करण्याचा दावा न्याय्य ठरतो का?*देहदंडाची शिक्षा परावर्तित होऊन जन्मठेप झालेल्या गुन्हेगारांना सुटकेची मागणी करण्याचा अधिकार असेल की राज्य सरकार संबंधित गुन्हेगाराशी न बोलताही हा निर्णय घेऊ शकेल?*जी प्रकरणे सीबीआयकडे होती अशा प्रकरणांमध्ये गुन्हेगारांची सुटका करण्याचा अधिकार राज्य सरकारांना आहे का?*ज्या गुन्हेगारांची देहदंडाची शिक्षा कमी करण्यात आली आहे अशांची मुक्तता केव्हा करायची याबाबतचा निर्णय सरकार घेऊ शकते की सर्वोच्च न्यायालयच याबाबत आदेश देऊ शकते?*जन्मठेप या शिक्षेचा कालावधी नेमका किती ग्राह्य़ धरावा?*अशा प्रकरणांमध्ये मुक्ततेसाठी विनंती करता न येणे अशी नवीन तरतूदच करता येऊ शकेल का?