देशात धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या चर्चेनं डोकं वर काढलेलं असतानाच हरयाणा भाजपाचे प्रवक्ते आणि करणी सेनेचे अध्यक्ष सूरजपाल अमू यांनी सैफ अली खानसह पतौडी घराण्यावर गंभीर आरोप करत टीका केली आहे. रविवारी झालेल्या महापंचायतीत बोलताना सूरजपाल अमू यांनी पतौडींनीच लव जिहादचं बीज पेरलं असून, शर्मिला टागोरांपासून हे सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी करिना कपूरलाही नाव न घेता आवाहन केलं.

गुरगावमध्ये रविवारी महापंचायत पार पडली. या पंचायतीत लव्ह जिहाद, धर्मांतर आणि लोकसंख्या नियंत्रण कायद्यावर चर्चा झाली. या महापंचायतीला उपस्थित असलेल्या सूरजपाल अमू यांनी सैफ अली खान आणि पतौडी घराण्यावर लव्ह जिहादचा आरोप केला. ते म्हणाले,”पतौडींमध्येही लव जिहाद आहे. ज्यांनी तैमूरला जन्म दिला, ते सुद्धा पतौडी घराण्यातीलच आहेत. ठाकूर साहेब इथे बसलेले आहेत; जेव्हा पतौडी संस्थानाच्या नवाबांचं निधन झालं, तेव्हा त्यांना फेटा बांधऱ्यामध्ये तेही होते. दुसऱ्याचा सन्मान ठेवणं आम्हाला माहिती आहे. हे पुरे झालं, इतकीच विनंती आम्हाला तैमूरच्या आईला करायची आहे. हा लव जिहाद शर्मिला टागोरांपासून सुरू आहे. पतौडींनीच याचं बीज रोवलं होतं. पतौडी लोकच हे थांबवू शकतात. त्यांचं स्वागत करणं बंद करा,” असं वक्तव्य सूरजपाल अमू यांनी केलं.

हेही वाचा- …म्हणजे इथे तैमूर, औरंगजेब, बाबर जन्माला येणार नाहीत; भाजपा प्रवक्त्याचं वादग्रस्त विधान

पुढे बोलताना ते म्हणाले, “जर भारत आपली माता आहे, तर आपण पाकिस्तानचे बाप आहोत आणि या पाकिस्तानींना आपण इथे भाड्यानं घरं देणार नाही. यांना देशातून हाकला, तसा प्रस्ताव मंजूर करा,” असं ते म्हणाले. “१९४७ मध्ये देशाची फाळणी झाली. आपण १० लाख लोकांचे मृतदेह बघितले. त्या मृतदेहांची आतापर्यंत कुठेच माहिती नाही आणि आपण त्यांना घरं भाड्यानं देतोय. इतकंच नाही, तर पतौडीमध्ये त्यांचे पार्क उभारले जात आहेत. उभारण्यात येणाऱ्या पार्कचे दगड उखडून फेका… हे दगड काढून फेकण्यासाठी कोणते युवक तयार आहेत?,” असं सूरज पाल अमू म्हणाले.