पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्याचा भारताच्या हवाई दलाने बारा दिवसांमध्ये बदला घेतला. हवाई दलाच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून स्ट्राइक केले असून यात सुमारे ३५० दहशतवादी मारले गेले. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी भारतीय सैन्याचे अभिनंदन केले आहे. अपना टाइम आ गया, असे शोभा डे यांनी म्हटले आहे.

पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. पुलवामा येथील हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी केली जात होती. अखेर मंगळवारी सकाळी हवाई दलाने पाकच्या हद्दीत दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केला आणि देशभरात भारतीय सैन्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला.

प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी ट्विट केले आहे. त्या म्हणाल्या, अपना टाइम आ गया. शोभा डे यांनी आणखी एका ट्विटमध्ये इम्रान खान यांची खिल्ली उडवली आहे. ‘माझ्या सैन्याशी पंगा घेऊ नका, अन्यथा ते शरणागती स्वीकारतील’, असे इम्रान खान म्हणत असल्याचे शोभा डे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम या राजकीय पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, एखाद्या आत्मसन्मान असलेल्या देशाने जे करायला हवे ते आपण केले आहे, असे त्यांनी सांगितले.