सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिल्यानंतर बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आनंद व्यक्त केला. हा अन्यायाविरुद्ध न्यायाचा विजय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मात्र यावेळी त्यांनी रिया चक्रवर्तीसंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलातना मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर भाष्य करण्याची तिची लायकी नाही असं म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावर पत्रकारांनी पुन्हा प्रश्न केला असता त्यांनी परत एकदा रिया चक्रवर्तीची लायकी नाही असा उल्लेख केला.

बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच आज हे यश मिळालं असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय सुनावताना, मुंबई पोलिसांना सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला आहे. तसंच सीबीआयला तपासात सहकार्य करण्यासही सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने पाटणा येथे रिया चक्रवर्तीविरोधात दाखल झालेला एफआयआर योग्य असल्याचं यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- “हा अन्यायाविरुद्ध न्यायाचा विजय,” सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर बिहारच्या डीजीपींनी व्यक्त केला आनंद

प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं की, “न्यायालयाच्या निर्णयामुळे १३० कोटी जनतेच्या मनात सर्वोच्च न्यायालयायबद्दल असलेली आस्था अजून दृढ झाली आहे. लोकांचा लोकशाहीवरील विश्वास वाढला आहे. आता लोकांना सुशांत सिंह प्रकरणी न्याय मिळेल असा विश्वास वाटू लागला आहे”.

आणखी वाचा- सुशांत सिंह मृत्यू प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर मुंबई पोलीस आयुक्त म्हणाले…

“ही संपूर्ण देशासाठी मोठी बातमी आहे. आमच्यावर अनेक आरोप केले जात होते. केस दाखल का केली अशी विचारणा होत होती. तपासासाठी अधिकाऱ्याला पाठवलं तर त्याला कैद्याप्रमाणे क्वारंटाइन करण्यात आलं. यावरुनच लोकांना काहीतरी गडबड असल्याचं वाटत होतं. आम्ही जे काही काम केलं ते कायदेशीर पद्धतीने केलं. सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे,” असं गुप्तेश्वर पांडे यांनी सांगितलं.

आणखी वाचा- “सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने सिद्ध झालं..,” सुशांत प्रकरणी नितीश कुमार यांची पहिली प्रतिक्रिया

“मुंबई पोलिसांनी केलेला तपास अगदी चुकीचा आणि बेकायदेशीर होता. आम्ही करत असलेल्या तपासातून निकाल हाती येणारच. कारण ही फक्त एका व्यक्तीची, एका कुटुंबाची किंवा माझी वैयक्तिक लढाईनाही तर १३० कोटी जनता ज्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे त्यांची लढाई आहे,” असं गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं आहे.