आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा २०१४ सारख्या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकणार नसल्याची भविष्यवाणी माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाला सोडचिठ्ठी दिलेल्या यशवंत सिन्हा यांनी केली आहे. जर २०१९ मधील सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाले तर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आण केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासारखे भाजपाचे अनेक मोठे आणि हुशार नेते मार्गदर्शक मंडळात पाठवले जाऊ शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

‘रेडिफ.कॉम’ शी बोलताना सिन्हा म्हणाले की, भाजपाच्या मार्गदर्शक मंडळात अनेक जागा रिकाम्या आहेत. कारण त्यांनी याची संख्याच निश्चित केलेली नाही. दरम्यान, सुषमा स्वराज, उमा भारती आणि सुमित्रा महाजन यांच्या समवेत सुमारे १५० विद्यमान खासदारांना भाजपा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देणार नसल्याचे वृत्त सोमवारी माध्यमांत आले होते. यामागे वेगवेगळी कारणे असल्याचे सांगण्यात येतात.

यावेळी निवडणुकीत भाजपा एकट्याने बहुमत सिद्ध करू शकणार नाही. २०१४ मधील सहकारी पक्षांनी एनडीएची साथ सोडली आहे आणि अनेकजण सोडतीलही. टीडीपीने आधीच साथ सोडली आहे. शिवसेना आणि नितीश कुमार यांची जेडीयूही एनडीए सोडण्याची पार्श्वभूमी तयार करत आहे, असे सिन्हा म्हणाले. जर भाजपा २०० ते २२० जागा जिंकू शकली नाही तर अशावेळी सहयोगी पक्ष नेतृत्व बदलाची मागणीही करू शकतात. पण मोदी आणि शाह यांची जोडगळी कोणत्याही परिस्थिती मोदींनाच नेता म्हणून कायम ठेवण्यात यशस्वी होतील.

ते म्हणाले, सध्याचे एनडीएचे स्वरूप जसजशी निवडणूक जवळ येईल त्याप्रमाणे त्यात बदल होताना दिसेल. सरकारमध्ये बसलेले लोक जाणूनबुजून गंभीर विषयावर चर्चा करून इच्छित नाहीत. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना भाजपासारखी संवाद कौशल्याची क्षमता विकसित करावी लागेल.