बांगलादेशमधील धर्मनिरपेक्ष ब्लॉगर अनंता बिजय दास यांची हत्या केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या एका संशयित विद्यार्थ्यांने हत्येची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली असून या प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.
मनन राही हा सहजलाल विद्यापीठातील शास्त्र आणि तंत्रज्ञान विभागाचा विद्यार्थी आहे. त्याने सिल्हेट न्यायालयात हजर करण्याआधी कबुलीजबाब दिला. ब्लॉगर हत्या प्रकरणात सहभाग असल्याची राहीने कबुली दिल्याचे पोलीस अधिकारी अरमान अली यांनी सांगितले. दोन विद्यार्थ्यांसह पाच जणांनी मिळून ब्लॉगर दास यांची हत्या केल्याचा दावा सीआयडीने केला आहे. या प्रकरणाबाबत तपास सुरू असल्याने माहिती लगेच उघड करणे शक्य नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दास यांची १२ मे रोजी हत्या केली होती.