सध्या भारतात स्वाइन फ्लूचा संसर्ग जास्त असला तरी त्या देशाने या विषाणूमध्ये काही जनुकीय उत्परिवर्तन झाले आहे किंवा नाही याचा शोध घ्यावा व विषाणूची जनुकीय संकेतावली तयार करून या इन्फ्लुएंझावर अधिक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करावा,  असा सल्ला अमेरिकेतील प्रतिकारशक्ती प्रणाली तज्ज्ञ व अँटलांटा येथील इमोरी लस केंद्राचे तज्ज्ञ डॉ. रफी अहमद यांनी दिला आहे.
यांनी वार्ताहरांना सांगितले की, स्वाइन फ्लूचा भारतात प्रादुर्भाव असला तरी त्या विषाणूत काही जनुकीय बदल झाले आहेत किंवा नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे, तो विषाणू जगातील एच१ एन१ विषाणूपेक्षा वेगळा नाही याची खातरजमा करणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतीय वैज्ञानिकांनी या विषाणूची संकेतावली तयार करावी ती काही आठवडय़ात तयार करता येईल. एच१ एन१ चा संसर्ग वाढण्याची कारणे शोधली पाहिजेत, मुलांमध्ये या रोगाने मरण्याची संख्या जास्त आहे त्यामुळे जगाच्या इतर भागातील स्वाइन फ्लूचा विषाणू व भारतातील विषाणू यांच्यातील फरक शोधला पाहिजे. भारतीय आरोग्य अधिकाऱ्यांनाच नव्हे तर जगातील वैज्ञानिकांना त्यामुळे या विषाणूची अधिक माहिती होईल. जर या विषाणूत काही फरक असेल तर तो जगात पसरल्यास त्यामुळे घातक परिणाम होतील.
जेनो टायपिंग तंत्राने या विषाणूची अधिक माहिती घेता येईल व भारतातील वैज्ञानिक व आरोग्य अधिकाऱ्यांना हा इशारा आहे. जास्त संसर्ग रोखण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे गरजेचे आहे पण दीर्घकालीन विचार करता इन्फ्लुएंझावर अधिक संशोधन गरजेचे आहे. भारतीय लोक या संसर्गाला प्रतिसाद देत आहेत याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
स्वाइन फ्लू हा विकसनशील देशात पसरतो आहे. त्यामुळे इन्फ्लुएंझाच्या विविध प्रकारांपासून संरक्षण देणारी सामायिक लस शोधणे गरजेचे आहे. त्यामुळे विषाणूंच्या अनेक प्रकारांपासून संरक्षण मिळेल. जे विषाणू आता फिरत आहेत ते वगळता इतर विषाणूंपासूनही संरक्षण मिळेल. हे करणे आव्हानात्मक आहे, पण अमेरिका व युरोपातील अनेक प्रयोगशाळांमध्ये त्याबाबत प्रयोग सुरू आहेत. सुधारित सामायिक लस तयार करण्यास जागतिक आरोग्य संघटनेचाही पाठिंबा आहे. भारतात अशी सामायिक लस तयार करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे.
सामायिक लस शोधण्यासाठी प्रयत्न चालू आहेत पण ती अजून प्राथमिक अवस्थेत आहे. जर सामायिक लस तयार करता आली नाही तर प्रभावी इन्फ्लुएंझा लस वापरली तरी चालू शकेल. सध्या तरी फ्लूवरची लस एवढाच उपाय हातात आहे. जगातील त्रिगुणी लशीचा ती लस हा एक भाग असून ती सुरक्षित आहे. लशीमुळे २० ते ५० टक्के संरक्षण मिळते तरी लसीकरण करण्याचा सल्ला आपण देऊ असे त्यांनी भारतातील स्थिती विषयी सांगितले. लशीच्या किमती उपलब्धता या बाबी आहेत पण लस घेणे फायद्याचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वाइन फ्लूच्या पूर्वीच्या व आताच्या विषाणूत फरक नसल्याचे प्रयोगशाळांनी कळवले आहे. तसेच आताचा संसर्गही पूर्वीप्रमाणे एच१ एन१ विषाणूचा असल्याचे सांगण्यात आले आहे.
आरोग्य संघटनेचे लक्ष
भारतातील स्वाइन फ्लू स्थितीवर जागतिक आरोग्य संघटनेचे लक्ष आहे कारण या वर्षी १५ हजार लोकांना या रोगाचा संसर्ग झाला आहे. तरीही एच१ एन१ विषाणूच्या संसर्गाचा मोठा उद्रेक झाला आहे अशी स्थिती म्हणता येणार नाही. या काळात इन्फ्लुएंझा होणे हे नेहमीप्रमाणे आहे त्यात वेगळे काही नाही. तरी आम्ही भारत सरकारच्या संपर्कात आहोत असे जागतिक आरोग्य संघटनेच्या सहायक महासंचालक फ्लॅविया बुस्ट्रीयो यांनी सांगितले. प्रसारमाध्यमांनी इबोलाप्रमाणे स्वाइन फ्लूचे भडक व अतिरंजित  वार्तांकन करण्याचे टाळावे असा सल्लाही त्यांनी दिला.

आरोग्य खात्याची सज्जता
* देशात सध्या २१ प्रयोगशाळात मोफत तपासणी
* ओसेल्टामिविरच्या ५८०००  गोळ्या पुरवल्या
* एन ९५ मास्क ३००० (उपलब्ध साठा १०००० मास्क)
* व्यक्तीगत सुरक्षा संच-९५००
* स्वाइन फ्लूची एक वर्ष प्रभावाची लस तयार करण्यास ३ महिने लागतात
* भारत बायोटेक कंपनी लस तयार करण्यास प्रयत्नशील

इन्फ्लुएंझा विषाणूंचे प्रकार
* एच१ एन१
* एच२ एन २
* एच ३ एन २