भारत-पाकिस्तान सीमेवर सर्वांत उंचीवर उभारण्यात आलेला आणि देशाच्या सन्मानाचे प्रतिक असलेला राष्ट्रध्वज गेल्या तीन महिन्यांपासून गायब आहे. हा राष्ट्रध्वज ३६० फुटांवर उभारण्यात आल्यानंतर तो पाकिस्तानातील लाहोर येथूनही दिसतो, असा दावा करण्यात आला होता. मात्र, सध्या तो अपेक्षित ठिकाणी दिसत नाही. प्रशासनानेच तो उतरवून ठेवला असला, तरी येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी हा राष्ट्रध्वज पुन्हा मानाने फडकताना दिसेल, अशी आशा आहे.

सर्वाधिक उंच राष्ट्रध्वजाद्वारे भारत हेरगिरी करू शकतो, असा संशय पाकिस्तानने व्यक्त केला होता. त्यानंतर पाकिस्ताननेही आपणही असाच पाकिस्तानचा उंच राष्ट्रध्वज उभारणार असल्याचे म्हटले होते. भारताचा तो राष्ट्रध्वज गायब होण्यामागचे कारण प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रशासनाचे म्हणणे आहे की, जास्त उंचीवर असल्याने राष्ट्रध्वज वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे फाटत चालला होता. असे होणे हे देखील राष्ट्रध्वजाचा अपमान असल्याने अमृतसर जिल्हा प्रशासनाने यावर्षी एप्रिल महिन्यांत तो उतरवला. त्यानंतर तो पुन्हा फडकवण्यात आला नाही.

अमृतसरचे उपायुक्त कमलदीप सिंह संघा यांनी राज्याच्या गृह विभाग आणि नगरविकास मंत्रालयाला एक पत्र लिहून सांगितले होते की, पाकिस्तानातून दिसणारा झेंडा फाटल्यामुळे देशाची बदनामी होते. त्यामुळे पंजाब सरकार सध्या इतक्या उंचीवर लावण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाला फाटण्यापासून बचावासाठी उपाय शोधण्यात येत आहेत.

भारत-पाकिस्तान सीमेवर मार्च २०१७ मध्ये देशातील सर्वाधिक उंच राष्ट्रध्वज लावण्यात आला. अटारी व्यतिरिक्त अमृतसरच्या रंजीत एव्हेन्यूवर देखील १७० फूट उंचीवर राष्ट्रध्वज लावण्यात आला होता. अमृतसरचे खासदार गुरजीत सिंह यांनी सांगितले की, एका दिवसासाठी का होईना १५ ऑगस्टला राष्ट्रध्वज या ठिकाणी जरूर फडकावण्यात येईल.

या झेंड्याच्या देखभालीची जबाबदारी अमृतसरच्या इम्प्रूवमेंट ट्रस्टची आहे. अटारी सीमेवर ३६० फूट उंचीवर लावण्यात आलेला हा राष्ट्रध्वज आत्तापर्यंत तीनदा फाटला आहे. त्याचबरोबर रंजीत अव्हेन्यूवरील झेंड्यासाठी आत्तापर्यंत ९ लाख रुपये तर अटारी येथील ध्वजासाठी ६ लाख रुपये खर्च झाले आहेत.