तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता जोर धरू लागला आहे. निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा राजकीय पक्षांकडून करण्याबरोबरच जाहीरनामेही प्रसिद्ध केले जाऊ लागले आहेत. तामिळनाडूत सध्या सत्तेवर असलेल्या अण्णाद्रमुकनंही रविवारी जाहीरनामा घोषित केला. या जाहीरनाम्यातून मतदारांवर आश्वासनांचा पाऊसच अण्णाद्रमुक पाडला आहे.

अण्णाद्रमुकने जाहीरनामा प्रसिद्ध करताना अनेक आश्वासने मतदारांना दिली आहे. पुन्हा सत्तेत आल्यास राज्यातील प्रत्येक कुटुंबाला एका वर्षात ६ सिलेंडर मोफत देण्यात येईल. त्याचबरोबर कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जाईल, असं आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांनी घेतलेलं शैक्षणिक कर्ज माफ करण्याचं आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना २जी डाटा मोफत देण्याचं वचनही अण्णाद्रमकने दिलं आहे. मध्यान्ह भोजन आहार नववी, दहावी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सुरू करण्याचाही समावेश वचन नाम्यात समावेश करण्यात आलेला आहे.

वृद्धांना देण्यात येणाऱ्या पेन्शनमध्ये दुप्पट वाढ करण्याचं आश्वासन अण्णाद्रमुकने दिलं आहे. सध्या ज्येष्ठ नागरिकांना १ हजार रुपये पेन्शन मिळते, ती २ हजार करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. याचबरोबर मद्रास उच्च न्यायालयाचं तामिळनाडू उच्च न्यायालय असं नामांतर करण्याची आणि श्रीलंकन निर्वासितांना दुहेरी नागरिकत्व आणि राहण्याचा परवाना देण्याचाही जाहीरनाम्यात समावेश करण्यात आलेला आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल पुनर्विचार करण्यासाठी केंद्राला विनंती करेल, असंही अण्णाद्रमुकने म्हटलं आहे. जाहीरनाम्यात आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. मातृत्व रजा वाढवून एक करण्याचं आश्वासन देण्यात आलं असून, अम्मा बॅंकिंग कार्ड, शहरात अण्णा पेट्रोल वाहन, रिक्षा चालकांसाठी एमजीआर ऑटो योजनेतंर्गत अनुदान देण्याची घोषणा अण्णाद्रमुकने जाहीरनाम्यातून केली आहे.