तामिळनाडूत मुसळधार पावसामुळे जिवीतहानी झाली आहे. मेट्टूपलायमजवळच्या नादूर गावात चार घरे कोसळली असून या दुर्घटनेत दोन लहान मुलांसह १७ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बचाव पथकांनी सर्व मृतदेह बाहेर काढून मेट्टूपलायममधील सरकारी रुग्णालयात पाठवले आहेत.

नादूर गाव कोइमबतोरपासून ५० किमी अंतरावर आहे. सर्व जण गाढ झोपेमध्ये असताना पहाटेच्या ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. दुर्घटनाग्रस्त घराजवळ एक २० फूट उंचीची भिंत होती. ही भिंत या घरांवर पडली त्या धक्क्याने ही घरे कोसळली. घरांमधील सदस्य ढिगाऱ्याखाली अडकले होते.

शेजाऱ्यांनी मेट्टूपलायम पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी बचाव पथकांना बोलावले. बचाव पथकांनी तात्काळ मदतकार्य सुरु करुन ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढले.