लस खरेदी, प्राधान्यक्रम आणि वितरण या संबंधी निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती बनवण्यात आली आहे. निती आयोगाचे डॉ. व्ही.के.पॉल यांच्या अध्यक्षतेखाली या तज्ज्ञ समितीची उद्या बुधवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. सध्याच्या घडीला लस हाच करोना व्हायरसच्या संकटातून मुक्ती मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे. जगातील तीन ते चार लसी मानवी चाचणीच्या अंतिम टप्प्यावर पोहोचल्या आहेत. सर्व काही सुरळीत झाले तर सप्टेंबरपासून लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होऊ शकते.

त्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे लसीकरण कसे करायचे? त्याचा आराखडा निश्चित करण्यासंदर्भात बुधवारी टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक होणार आहे. भारतात २२ लाखापेक्षा जास्त लोकांना करोनाची बाधा झाली असून आतापर्यंत ४४ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही समिती राज्य सरकार आणि लस उत्पादकांबरोबरही चर्चा करेल असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

करोनावरील लसीचा कार्यक्रम ठरवताना सर्व अंगांनी विचार करण्यासाठी सरकारने तज्ज्ञांची ही समिती स्थापना केली. यामध्ये संबंधित मंत्रालये, संस्थांचे प्रतिनिधी आहेत. लस निवडण्यापासून ते खरेदी आणि वितरणाची जबाबदारी टास्क फोर्सवर असेल. सोमवारी भारतामध्ये ६२,०६४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. एकाच दिवसात एक हजारपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला.