करोनाशी लढण्यासाठी केंद्राच्या आणि राज्याच्या सहाय्यता निधीसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यामध्ये टाटा ट्रस्टने आजवरची सर्वात मोठी मदत जाहीर केली आहे. ट्रस्ट या आजाराशी लढण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करण्यासाठी ५०० कोटी रुपये देऊ केले आहेत. यापूर्वी बजाज ग्रुपने १०० कोटी रुपयांची मदत करोनाशी लढण्यासाठी सरकारला देऊ केली होती.

रतन टाटा यांनी ट्विटद्वारे म्हटले की, करोनाचं संकट हे मानवजातीसमोरील अत्यंत कठीण आव्हान आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा समूहाच्या कंपन्यांनी यापूर्वी देशाच्या गरजा भागवल्या आहेत. सध्याचं संकट हे मानवी शर्यतीतील भेडसावणार्‍या कठीण आव्हानांपैकी एक आहे.

दरम्यान, टाटा ट्रस्टने सर्व बाधित रुग्णांचे संरक्षण आणि सबलीकरण करण्याची ग्वाही दिली आहे. त्यासाठी त्यांनी ५०० कोटी रुपये देण्याचे वचनही दिले आहे. टाटा ट्रस्टने म्हटलंय की, करोना विषाणूंशी लढण्यासाठी जी यंत्रणा उभी करावी लागणार आहे, त्यासाठी याचा वापर करण्यात यावा.

  • करोनाशी लढताना अग्रभागी असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) निर्माण करणे
  • वाढत्या घटनांवर उपचार करण्यासाठी श्वसनप्रणाली निर्माण करणे
  • दरडोई चाचणी वाढविण्यासाठी चाचणी किटची निर्मिती करणे
  • संक्रमित रूग्णांसाठी मॉड्यूलर उपचार सुविधा उभारणे
  • आरोग्य कर्मचारी आणि सामान्य लोकांचे ज्ञान व्यवस्थापन आणि प्रशिक्षण देणे

आणखी वाचा- India needs! मारुतीचं महिन्याला १० हजार व्हेंटिलेटर्स बनवण्याचं लक्ष्य

टाटा ट्रस्ट, टाटा सन्स आणि टाटा ग्रुप ऑफ कंपनीज स्थानिक, जागतिक संस्थांसह सरकारसोबत करोनाशी लढण्यासाठी जोडले गलेले आहेत, असे सांगताना टाटा ट्रस्टने स्वतःचा जीव धोक्यात घालून या संकटाशी लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आम्ही सन्मान करतो, अशा शब्दांत कृतज्ञताही व्यक्त केली आहे.